नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांच्या ताफ्यात दोघांवर हल्लेखोरांनी गोळीबार केलाच कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत तीन जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली असली, तरी हे सगळं घडलं तरी कसं? याविषयी अजूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असणारे काही पत्रकार या सर्व थरारक घटनेचे साक्षीदार झाले होते. त्यांनी या घटनेचा घटनाक्रम सांगितला आहे.
अनेक गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या अतिक अहमदला वैद्यकीय तपासणीसाठी प्रयागराजमध्ये आणलं जात असताना पोलीस व्हॅनमधून उतरताच अतिकला माध्यम प्रतिनिधींनी गराडा घातला! अतिक अहमदला त्याच्या मुलाच्या अंत्ययात्रेला जाण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली होती. त्यामुळे माध्यम प्रतिनिधींनी सर्वात आधी अतिकला त्याचसंदर्भात प्रश्न विचारला. यावेळी त्याच्या आसपास किमान १० ते १२ पोलिसांना गराडा होता. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना अतिक म्हणाला, “आता त्यांनी मला नाही जाऊ दिलं तर नाही जाऊ दिलं, काय करणार?” अतिकचं हे उत्तर संपलं आणि त्याच्या डाव्या बाजूने एक पिस्तुल त्याच्या डोक्यावर ठेवल्याचं दृश्यांमध्ये दिसलं आणि गोळ्या झाडण्याचा आवाज झाला.
VIDEO | “One of my colleagues pushed me down and saved my life”: First-hand account of the incident by PTI Journalist Pankaj Srivastava, who was on the spot in Prayagraj. pic.twitter.com/5nADK4mfsX
— Press Trust of India (@PTI_News) April 15, 2023
दरम्यान, प्रयागराजमध्ये घडलेल्या या सगळ्या थरारक घडामोडींचा प्रत्यक्षदर्शी अनुभव पीटीआय या वृत्तसंस्थेचे पत्रकार पंकज श्रीवास्तव यांनी सांगितला आहे. “प्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि अशरफला मेडिकल चेकअपसाठी आणलं होतं. माझ्यासोबत अजून काही पत्रकार होते. आम्ही त्याची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचवेळी अचानक अनेक गोळ्या झाडल्या गेल्या. अतिक अहमद आणि अशरफ दोघं जमिनीवर पडले. ऑन द स्पॉट त्यांचा मृत्यू झाला. आम्हालाही थोडी जखम झाली”, असं श्रीवास्तव म्हणाले.
“किमान १५ ते २० गोळ्या झाडल्या गेल्या. ३ ते ४ हल्लेखोर होते. आमच्या एका सहकाऱ्यानं मला धक्का दिला. त्यामुळे मी खाली पडलो आणि गोळी माझ्या डोक्यावरून निघून गेली. त्यामुळे माझा जीव वाचू शकला. पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणी तीन लोकांना अटक केली आहे. आत्तापर्यंत दोन पिस्तुलं ताब्यात घेण्यात आली आहेत”, अशी माहिती श्रीवास्तव यांनी दिली आहे.