नवी दिल्ली – गेल्या आठ वर्षांत केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या गलथान व चुकीच्या कारभारामुळे देशाची अपरिमित हानी झाली आहे, असा आरोप करताना कॉंग्रेसने या सरकारच्या आठ वर्षातील आठ मोठ्या चुका एका पुस्तिकेद्वारे देशाच्या नजरेला आणल्या आहेत. त्यावर भारतीय जनता पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी गुरुवारी सांगितले की, आज कॉंग्रेसचेच काही महत्त्व आणि अस्तित्व देशात उरलेले नाही, त्यांना मोदी सरकारने केलेली कामे दिसत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.
संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारताने पहिल्यांदाच पूर्ण स्वावलंबन गाठले आहे हे जर कोणी पाहू शकत नसेल तर तो त्यांच्या डोळ्यांचा दोष आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, आज जगात आव्हानात्मक आर्थिक परिस्थिती आहे.
असे असूनही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यक्षम धोरणांमुळे महागाई दरापेक्षा आपला विकासदर अधिक आहे. मोदी सरकारच्या या 8 वर्षात देशाने सर्वात मोठी आर्थिक समावेशन योजना राबवली, सर्वात मोठी आरोग्य योजना, सर्वात मोठे अन्न वितरण आणि सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम साध्य केला.
ते म्हणाले की, प्रत्येक गावात वीज आणि रस्ता पोहोचला. आता प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहोचण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज देशात जास्तीत जास्त परकीय चलनसाठा आणि थेट विदेशी गुंतवणूक आणि जास्तीत जास्त स्टार्टअप आहे,” असे त्रिवेदी म्हणाले.
गुरुवारी कॉंग्रेसने 8 साल, 8 छल, भाजपा सरकार विफल अशा नावाची पुस्तिका काढून कॉंग्रेसने भाजपचे वाभाडे काढले आहे. महागाई, बेरोजगारी विक्रमी पातळीवर गेली असून आर्थिक क्षेत्राचा पूर्ण बोजवारा उडाला असल्याचे आरोप या पुस्तिकेत आकडेवारीनिशी सादर केले आहेत त्यावर भाजप प्रवक्त्यांनी हा प्रतिहल्ला चढवला.