नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (शनिवार) स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करणार आहेत. सलग सातव्या वर्षी मोदींना तो मान मिळाला आहे. भाषणात मोदी कुठली घोषणा करणार याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा मुख्य सोहळा होणार आहे. त्या सोहळ्यात होणाऱ्या मोदी यांच्या भाषणाकडे संपूूर्ण देशाचे लक्ष लागणार आहे. याआधीच्या भाषणांमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. यावेळी करोना संकटाच्या सावटात स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे.
चीनशी सीमेवर निर्माण झालेला तणाव आणि केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारताचे समोर ठेवलेले उद्दिष्ट आदींच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या प्रभावी भाषणशैलीचा कस लागणार आहे. करोना संकटामुळे यावेळच्या सोहळ्याचे स्वरूप नेहमीप्रमाणे भव्यदिव्य नसेल. तसे असले तरी सोहळ्याची प्रतिष्ठा विचारात घेऊन त्यापद्धतीने आयोजन केले जाणार आहे. त्या सोहळ्याला सुमारे 4 हजार आमंत्रितच उपस्थित राहू शकतील. त्या सोहळ्यासाठी बहुस्तरीय सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे लाल किल्ला परिसराला लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.