चेन्नई: देशात सध्या पावसाळा सुरु आहे. कुठे मुसळधार तर कुठे माध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मात्र असे असले तरी देशात असे एक शहर आहे जिथे आजही पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे. जमिनीखाली असणाऱ्या पाण्याची पातळी एवढी खाली गेली आहे कि याची चिंता आता भूजलतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
भूजल संपणारे चेन्नई हे देशातील पहिले शहर बनले आहे. याठिकाणी आता भूमिगत पाण्यासाठी 2000 फुटांपर्यंत खोदकाम करण्यात येत आहे मात्र हाती काहीच लागत नसल्याचे दिसत आहे. तामिळनाडू सरकारकडून याविषयी माहिती जारी करण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील भूजल पातळी पूर्णपणे कमी झाल्यामुळे बोअरिंगवर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
200 फुटांपर्यंत मुबलक पाणी देणाऱ्या चेन्नईच्या या दुर्दशेमागचे मुख्य कारण म्हणजे संपूर्ण शहर सिमेंटचे रस्ते आणि बांधकामांनी भरणे हे आहे. शहराच्या कोणत्याही भागात जमिनीवर पाणी जाण्यासाठी मार्गच उरला नाही त्यामुळे आता उन्हाळ्यात चेन्नईला भीषण पाणीसंकटाला सामोरे जावे लागत आहे.
जमिनीवर भरमसाठपणे करण्यात आलेल्या सिमेंटच्या बांधकामामुळे पाणी जमिनीत मुरण्यासाठी कोणताही मार्ग उरला नसल्याचे इथल्या स्थानिक रहिवाशांनी म्हटले आहे. तसेच प्रशासनाने जलसंधारणासाठी कोणतीही मोहीम राबवली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच काही निवडक तलावाची बांधकामाची शैली देखील अस्थाव्यस्त असल्याने इथले लोक पाण्यासाठी धडपडत आहेत. याचबरोबर भूलजपातळी वाढावी यासाठी कोणतेही विशेष काम करण्यात आले नाही त्यामुळेच संपूर्ण शहरातील भूमिगत पाणी संपले असल्याचे सांगण्यात येत आहे.
तर दुसरीकडे ही दुर्दशा झाल्याची जिल्हा प्रशासनाने मान्य केली असून त्यांनी सामान्य लोकांना त्यांच्या घरांच्या खाली तळघरात पावसाचे पाणी साठवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून तेच पाणी काही महिन्यांसाठी इतर कामांसाठी वापरता येईल. एवढेच नाही तर चेन्नई महानगरपालिकेने म्हटले आहे की, आम्ही फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच तयारी करत आहोत त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या सांडपाण्याची तयारी पावसाचे पाणी साठवून करावी असे आवाहन करण्यात आले आहे.