सातारा – जिहे-कठापूर योजनेचे पाणी आंधळी बोगद्यातून नेताना वेटणे आणि रणसिंगवाडी या गावांना 0.13 टीएमसी पाणी देण्याचा विषय अंतिम टप्प्यात आहे. जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांच्या सहीनंतर याबाबतची फाइल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. टेंभू आणि जिहे-कठापूर योजनांच्या पाणी फेरवाटपाचा प्रस्तावही अंतिम टप्प्यात आला आहे, अशी माहिती आ. जयकुमार गोरे यांनी दिली.
गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी माण तालुक्यात नेण्याची कामे पूर्णत्वाकडे आहेत. नेरपासून आंधळी बोगद्यातून माण तालुक्यात पाणी नेण्यात येणार आहे. वेटणे आणि रणसिंगवाडी या गावांमधून हा बोगदा गेल्याने तेथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिहे-कठापूर योजनेचे 0.13 टीएमसी पाणी या गावांना मिळावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. या संदर्भात आ. गोरे यांनी मंगळवारी मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, सचिव नार्वेकर आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या दोन गावांना जिहे-कठापूर योजनेतून पाणी देण्याचा निर्णय बैठकीत झाला. प्रधान सचिवांच्या सहीनंतर ही फाइल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आली आहे.
त्यामुळे हा विषय त्वरित मार्गी लागणार असल्याचे आ. गोरे यांनी सांगितले. जिहे-कठापूर आणि टेंभू योजनेच्या पाण्याच्या फेरवाटपाचा मुद्दाही अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. माण तालुक्यातील बिजवडी, मोगराळे, शिंगणापूर, मोही, परखंदी, थदाळे, तोंडलेसह 18 गावांसाठी जिहे-कठापूर योजनेचे 1.14 टीएमसी पाणी आरक्षित करण्यात येत आहे. जिहे-कठापूर योजनेचे पाणी आंधळी धरणातून उचलून माण तालुक्याच्या उत्तर भागाला देण्याच्या वाढीव योजनेची कामेही वेगाने सुरू आहेत. उरमोडीचे पाणी मतदारसंघातील लाभक्षेत्रात पोहोचत आहे. तारळी योजनेचे पाणी आणून टंचाईवर मात करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.