कोलकाता – पंचायत निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालमधील 19 जिल्ह्यांतील सुमारे 700 बूथवर आज फेरमतदान घेण्यात आले. या फेरमतदानावेळी कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या आधी या मतदार केंद्रावर झालेल्या हिंसक प्रकारात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि मतदान पेट्या पळवण्याचा प्रकार घडल्याने या सातशे केंद्रांवर या फेरमतदानाचा आदेश देण्यात आला होता.
मतदानाच्या दिवशी ठिकठिकाणी झालेल्या हिंसाचारात किमान पंधरा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. फेरमतदानासाठी आज कडेकोट बंदोबस्तात सकाळी मतदानाला सुरुवात झाली. प्रत्येक बूथवर राज्य पोलिसांव्यतिरिक्त चार केंद्रीय दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. दुपारी 1 वाजेपर्यंत 30.54 टक्के मतदान झाले होते. मतपेट्या वेळेवर न पोहोचल्याने काही बूथवर मतदान उशिरा सुरू झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मालदामध्ये, गाझोल ब्लॉकमधील राणीगंज पंचायतीमधील डोगाची येथे स्थानिकांनी एका बुथवरील मतदान रोखले. रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी स्थानिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला.शनिवारी मतदान होऊ न शकल्याने, पुन्हा मतदान घेण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु स्थानिकांनी बूथला कुलूप लावल्याने तेही होऊ शकले नाही.
नादियातील तेहट्टा येथे सकाळी रस्ता अडवण्यात आला होता पण नंतर पोलिसांनी तो मोकळा केला. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील मायना येथील बूथबाहेरही मतदारांनी निदर्शने केली. भाजपने सहा हजार मतदान केंद्रावर फेरमतदानाची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती.