राहाता – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जनता दरबार नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. प्रशासनातील अधिकारी आणि नागरिक यांच्यात योग्य समन्वय साधण्याचा प्रयत्न जनता दरबारातून होत असतो. रविवारी तब्बल 8 तास चाललेल्या दरबारात गर्दीचा उच्चांक झाला. नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्यातील संवेदनशीलता दाखवून दिली.
महिन्यातून एकदा अशा जनता दरबाराचे आयोजन मंत्री विखे पाटील यांच्याकडून केले जाते. मतदारसंघासह जिल्ह्यातील नागरिक आणि कार्यकर्ते आवर्जून या दरबारात येऊन आपल्या समस्या विखे पाटील यांच्या कानावर घालतात. शक्य असेल तिथेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या सूचना दिल्या जातात.
सार्वजनिक प्रश्नांसंदर्भात योग्य समन्वय साधून नागरिकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न मंत्री विखे पाटील यांच्या दरबारातून होत असल्याने अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नामध्ये योग्य मार्ग निघत असल्याचा अनेकांचा अनुभवच या दरबाराचे फलित असल्याचे नेहमीच बोलले जाते. रविवारच्या जनता दरबारात भेटणाऱ्या लोकांच्या गर्दीचा उच्चांक झाला. दोन वाजता सुरू झालेल्या दरबारात रात्री अकरा वाजता रांगेतील शेवटच्या माणसाचा अर्ज स्वीकारत मंत्री विखेंनी संवेदनशीलता दाखवून दिली.