प्रभा सोनवणे
कवयित्री सुखेशा म्हणजे स्वाती दाढे यांचा जाणिवांच्या परिघात हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. सुखेशा निसर्गात रमणारी संवेदनशील कवयित्री. त्यांची कविता सौम्य, मृदुल, तरल, हळूवार आहे. त्यात कुठलाही अभिनिवेश नाही. कवयित्रीने कुठलीच पताका खांद्यावर घेतलेली नाही. कवितेत कुठलाच वाद नाही.
तरीही ही कविता अतिशय प्रगल्भ आहे. या कवितांना आध्यात्मिक बैठक आहे. स्त्रीजाणिवा, मैत्री, प्रेम, सामाजिक बांधिलकी असे अवती-भोवतीचे अनेक विषय ही कविता चितारते! यांतील कविता विविध मासिकांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. कवयित्रीने आपल्या कवितांचे तीन भागांत यथार्थ नामकरण केले आहे. निर्गुणावली, अपूर्णावली आणि छंदावली. निर्गुणावली या भागामध्ये अनेक सुंदर, भक्तिमय, चिंतनशील अभंग रचना आहेत.
व्यापून बैसले विचार जीवना
नाही त्यांच्याविना क्षण एक ।।
व्यासांची प्रतिमा उष्टावे जगत
ते महाभारत नित्य येथे ।।
असे जीवनातील सत्य सांगणारे अभंग दाद घेऊन जातात. अपूर्णावली या दुसऱ्या भागात संमिश्र कविता आहेत. “तृणी’ या पादाकुलक वृत्तातील कवितेत मनोहर निसर्गचित्र आहे. रद्दी ही कविता विशेष आहे. यात प्रत्येक कवयित्रीचे दुःख नेमकेपणाने आले आहे. ईश्वरदत्त प्रतिभेची देणगी असलेल्या स्त्रीची उपेक्षा, श्रेय न देण्याची वृत्ती हे सार्वत्रिक सत्य ही कविता दाखवते. तिनोळी या नाजूक काव्यप्रकारातल्या कणिका विशेष आहेत.
माघाची चाहूल
खोडांवर खळबळ
आली की पानगळ ।
वाढतं वय
ओसरतं सौंदर्य
मनभर औदार्य ।
पर्यावरणाचा ऱ्हास, तकलादू विकास यावर भाष्य करणारी ही कविता पहा…
कृत्रिम, विदेशी झाडे लावा
शोभेच्या त्या पुतळ्या ठेवा
उडवा दारू, उदरी रिचवा
निसर्गाशी मांडा दावा ।
या कवितांमध्ये भावभावनांची समृद्धता आहे.
सावळ मेघांनी कोंदले आभाळ, आता रानोमाळ जलोत्सव ।
यांतून कवयित्रीचे उत्कट निसर्ग-प्रेम जाणवते. छंदावली विभागात आनंदकंद, भूपतिवैभव, अनलज्वाला, मालिनी, धवलचंद्रिका इत्यादी वृत्तातील सुरेख रचना आहेत. या रचना अजिबात क्लिष्ट नाहीत तर सहज सोप्या, सामान्य वाचकाला समजणाऱ्या अशा आहेत.
आधिची साधी नि भोळी, नाहीच आता राहिले
शेरास सव्वा शेर मज, होणे जगाने शिकविले।
अशी स्वशोधाची ही कविता आहे. स्त्री म्हणून जगताना आलेले अनुभव, क्वचित कुचंबणा, उपेक्षा खूप बारकाईने ही लेखणी टिपते.
मन एकांती रमून फिरणे जमते आहे ।
तसेच,
माझ्यावर मी टीका करणे, आहे सोडून दिले
मीच स्वतःला कमी लेखणे, आहे सोडून दिले ।
या रचना खास आहेत. “जाणिवांच्या परिघात’ काव्यसंग्रह दखल घेण्याजोगा, वाचनीय आहे. या कवितांमधून कवयित्रीच्या प्रगल्भ जाणिवा मोहवतात, हे नक्की!
अनाहत प्रकाशन, पुणे
किंमत : 130/-