प्रा. विकास देशपांडे
राष्ट्र सेवा दलाच्या वैचारिकतेशी शंभर टक्के समर्पित असलेले उल्हास कृष्णराव पाटील यांनी लिहिलेले पुस्तक प्रत्येक सक्रिय सैनिकाने आणि सदस्याने आवर्जून वाचले पाहिजे. यात लोकराजा सयाजीराव गायकवाड यांचे चरित्र (जीवनसंघर्ष) आणि शुद्ध ऐसे ब्रह्मज्ञान या निवडक अभंगांचे निरुपण यांचा समावेश आहे. सयाजीराव महाराजांच्या अफाट कार्याचा गौरव करताना त्यांनी कल्याणकारी, पुरोगामी धोरणं राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह अनेक महान व्यक्ती आणि संस्था यांना दिलेली भरघोस मदत व अनुषंगिक उपक्रम यांचा आढावा घेतला आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या चरित्रात त्यांनी महाराजांच्या संघर्षशील जीवनाचा वेधक आढावा घेतला आहे. ही दोन पुस्तके मर्यादित (60 पृष्ठे) विस्तारांची असली तरी त्यांची गतिमानता व निवेदनशैली कथानकानुकूल असल्याने एका बैठकीत सलग वाचली जातात.
उल्हास पाटील यांचे सर्वात सविस्तरपणे लिहिलेले शुद्ध ऐसे ब्रह्मज्ञान हे पुस्तक वैचारिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. यामध्ये त्यांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या 100 निवडक अभंगांचे प्रगल्भ व सविस्तर विवेचन केले आहे. सदर विवेचनाच्या प्रस्तावनेत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी नमूद केलं की, जात, धर्म, लिंग, वंश आदी मानवनिर्मित भेदभाव हे अमंगल आहेत. तसेच समाज एका बाजूला राजकीय गुलामगिरीत व दुसऱ्या बाजूला धार्मिक गुलामगिरीमध्ये अडकून देशाची प्रगती कशी थांबली, हेही पटवून देण्याचा उल्हास पाटील यांनी प्रयत्न केल्याचे न्यायमूर्ती सावंत यांनी नमूद केलं आहे.
न्यायमूर्तींनी केलेल्या या गौरवानंतर अधिक काही नमूद करण्याची गरज आहे का? शिवाय सुप्रसिद्ध विचारवंत बिशप थॉमस डावरे यांनी तुकाराम महाराजांसंबंधीच्या एका विश्वासार्ह आणि उद्बोधक निर्मितीबद्दल उल्हास पाटील यांचे विशेष अभिनंदन केले आहे- मला तरी असे वाटते की, नरहर कुरुंदकर यांच्यानंतर सेवा दल सैनिकच नव्हे तर पुरोगामी समाजनिर्मितीसाठी प्रयत्नशील असणाऱ्यांसाठी तयार केलेले अत्यंत महत्त्वाचे लेखन म्हणून उल्हास पाटील यांनी केलेल्या या वरील पुस्तकांकडे निर्देश करावा लागेल यात संशय नाही! मी उल्हासजींना मन:पूर्वक धन्यवाद देतो.’ या समतामय धर्माचे जगद्गुरूंनी जे निरुपण केले, त्याबाबतचे सहृदयी चिंतन उल्हास पाटील यांनी प्रस्तुत केले आहे.