सणसवाडी – चाकण, खेड ते पुरंदर अशा आंतरराष्ट्रीय नियोजित विमानतळाच्या घिरट्या गेली काही वर्षांपासनू सुरूच आहेत. पुरंदर मधील मोठ्या विरोधानंतर विमानतळ सोयीस्कररीत्या बारामतीकडे सरकवले होते; पण तेथेही केंद्रीय सुरक्षा यंत्रणेची नकारघंटा वाजल्यानंतर आता खेड तालुका परिसरातील नेत्यांच्या सोशल मिडीयावर मागणीच्या वावड्या उठवल्या जात आहेत.
विमानतळ विरोधी व शेतकऱ्यांचा दिखाऊ कळवळा दाखवणारे नेते विमानतळ पुरंदरकडे नेल्याने मनातल्या मनात पस्तावाचे लाडू खात आहेत. एकमेकांवर चिखलफेक करत स्वतःचा राजकारणाचा सदरा स्वच्छ सफेद असल्याचे दाखवत होते. मध्येच कुणीतरी पुन्हा खेड जवळपास विमानतळ व्हावे ही सुप्त इच्छा प्रदर्शीत करत होते. पण एकदा धनुष्यातुन सोडलेला बाण परत माघारी येणे अशक्यप्राय होते म्हणून गपगुमान होते.
खेडला विमानतळ होणार म्हणून आपापल्या मर्जीतल्या डेव्हलपर्सना पाबळ, कान्हूर मेसाई भागात पडजमीनी घेण्यासाठी प्रवृत करून कित्येक ठिकाणी चढ्या दरात नेते व भांडवलदारांनी जमिनी घेतल्या. प्लॉटविक्रीचे फलक लावले; परंतु विमानतळ पुरंदरला गेल्यामुळे अनेकांचय पदरी निरोशा पडली. तोवर पुरंदर परिसरात अशाच चढ्या भावात जमिनीची खरेदी करून बसलेले आता पुन्हा विमानतळ होत नाही म्हणून धसका घेऊन बसले आहेत. तिकडेच विमानतळ व्हावे म्हणून बारामतीच्या पायाशी खेट्या घालत आहेत.
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी खासदार अमोल कोल्हेंना पत्राद्वारे या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुढाकार घेण्याचे कळविले व खासदार अमोल कोल्हेंनी पण त्यास सकारात्मक प्रतिसाद दाखविला. केंद्रात आमदार लांडगे यांच्या भाजपाची सता आहे आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी व महाविकास आघाडीच्या हातात सुत्रे आहेत. इथे बारामतीहून इकडे खेड, चाकणला विमानतळ आणावयाचे म्हटल्यास बारामतीच्या नेत्यांमध्ये एकमत करून त्यांचे गळा हा प्रस्ताव उतरला पाहिजे.
त्यानंतर एकजुटीने भगीरथ प्रयत्न केल्यास काहीही अशक्यप्राय नाही. या भागातील लहान मोठे पुढारी ही बाब खाजगीत बोलून दाखवत आहेत. पण यांची मोट बांधून पुढाकार कोणी घ्यायचा, यावर एकमत होईस्तोवर विमानाने दुसरीकडे इतरत्र उड्डाण भरले नाही म्हणजे बरे. त्यासाठी नुसत्या उंटावरून शेळ्या हाकून चालणार नाही तर वायुवेगाने मनस्वी प्रयत्नांची घोडदौड व्हायला हवी. पाहूया शिरूर लोकसभा मतदार संघातील सुज्ञ नेते पुढारी परत चालून आलेल्या संधीचा फायदा घेतात की, एकविचार करण्यात सोशल मिडीयावरच व्यक्त होत राहतात, हे भविष्यात कळेलच.
ठोस प्रयत्न व्हावेत
खेड – भोसरी भागचे नेते मात्र सोशल मीडियावर पाठ थोपटून मोठे काम केल्याचे भासवत आहेत. खरोखर या आमदार, खासदार, नेते, पुढाऱ्यांना खेडला विमानतळ आणण्यात रस असेल तर नुसता वरपांगी इन्ट्रेंस दाखवण्यापेक्षा युद्ध पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. खेड, चाकण, भोसरी, रांजणगाव भागातील उद्योजक व रयतेची मनोमन इच्छा आहे; पण योग्य माध्यमांतून योग्य पद्धतीने प्रयत्न व्हावयास हवेत.