शर्मिला जगताप
बैलगाडीच्या युगातून माणूस जंबो जेटच्या युगात पोहोचला. जीवनाचा वेग वाढत राहिला अन् या वेगाने माणसाला माणसापासून दूर नेले. यंत्रावर हुकमत गाजवणारा मानव अखेर स्वतःही एक यंत्रच बनला. वैज्ञानिक प्रगतीने माणसाचे आयुष्य नावीन्यपूर्ण बनवले खरे, पण या वेगवान जीवनक्रमाबरोबर धावता धावता माणसाच्या मनातला जिव्हाळा हरपला. ओलावा करपला अन् भावना होरपळून गेल्या. घरांची हॉटेल्स बनली. कुटुंबाची कैद वाटू लागली. नेमकं हेच दुःख बासु भट्टाचार्य यांच्या “अनुभव’ या जुन्या सिनेमामधून व्यक्त झालेले आहे.
अमर सेन हा प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाचा संपादक जगाच्या कल्याणाची काळजी वाहता वाहता त्याला आपल्या पत्नीचा विचार करायला वेळच नसतो. लग्नाला सहा वर्षे झालेली असूनही पती-पत्नीमध्ये कधीच जवळीक निर्माण झालेली नसते. कामाचा ताण, नोकरांचा वावर अन् पार्ट्या या साऱ्या गर्दीतून बिचारी मीता आपल्या पतीपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. या साऱ्याला कंटाळून ती अखेर घराला घरपण देण्याचा निश्चय करते. एका म्हाताऱ्या हरीशिवाय बाकी साऱ्या नोकरांना रजा देते. संसाराचं सारं स्वरूपच पालटून जातं अन् बघता बघता दोघं समरस होतात.
पण अचानक एक दिवस या स्वप्नाला तडा जातो. मीताचा पूर्वीचा मित्र शशी भूषण अचानक तिच्या आयुष्यात परत येतो- बरोबर एक वादळ घेऊन! शशीला अमर सेनचा सहसंपादक म्हणून नोकरी मिळते अन् त्याचं मित्राच्या घरी जाणं-येणं वाढू लागतं. त्या दोघांची मैत्री तिला अस्वस्थ करते अन् इकडे अमरच्या मनावर संशयाचं सावट पडतं. जे अस्तित्वातच नसतं त्याच्या कल्पनेत गुरफटून तो मित्रावर वैतागतो, चिडतो, शशीवर आरोप करतो. त्याला राजीनामा द्यायला सांगतो.
पण नंतर त्याचं त्यालाच जाणवतं की, हा सारा वैताग अनाठायी आहे. मीतावर अन् शशीवर आपण अन्याय करत आहोत, हे तो समजून चुकतो अन् संसारावरचं संकटाचं सावट वितळून जातं. जणू काही घडलंच नव्हतं अशा जिव्हाळ्याने पुन्हा दोन जीव एक होतात. आजच्या पती-पत्नीतील संशयाचे धुकं असंच विरळ व्हायला हवं.