पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल लावण्यासाठी आवश्यक ती तांत्रिक तयारी पूर्ण नसताना घाई केली होती. यामुळेच वेबसाइट क्रॅश झाली होती, असे निष्कर्ष चौकशी समितीने काढले आहेत. सायबर हल्ल्यामुळे नव्हे तर अपुऱ्या तांत्रिक तयारीमुळेच वेबसाइट क्रॅश झाल्याचा ठपका समितीने ठेवला आहे.
इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल तयार करण्यात आले होते. राज्य मंडळाने 16 जुलै रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्याची घोषणा केली होती. दरम्यान राज्य मंडळाने निकालासाठी उपलब्ध करून दिलेली वेबसाईट क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना तात्काळ वेळेत निकालच पाहता आहे नव्हते. यामुळे या सर्वांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
काही तांत्रिक बाबीमुळे संकेतस्थळावर निकाल प्राप्त होण्यास अडथळे निर्माण झाल्याप्रकरणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. निकाल घोषित करताना उद्भवलेल्या त्रुटीसंदर्भात चौकशी करण्यासाठी शासनाकडून शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली पाच विशेष अधिकाऱ्यांची चौकशी समितीही तत्काळ नियुक्त केली होती. या चौकशी समितीने राज्य मंडळात जावून विविध तपासणी करुन, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठका घेत चौकशी करुन सखोल अहवाल तयार करून तो शासनाकडे सादर केला आहे. हा अहवाल खूप गोपनीय ठेवण्यात आला आहे.
…तासाभरातच साडेतीन कोटी व्हिजिटर्स
बारावीच्या निकालावेळी गोंधळाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मंडळाने खबरदारी घेत 5 वेबसाइट उपलब्ध करून दिल्या होत्या. बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती, पण निकाल पाहण्यासाठी तासाभरातच साडेतीन कोटी जणांनी वेबसाइटला भेट दिल्याचे आढळून आले. यावरून हा सायबर हल्लाच असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती. दरम्यान, चौकशी समितीने ही शक्यता फेटाळून लावली आहे.
तांत्रिक उपाययोजना सूचविल्या
वेबसाइट क्रॅश होण्याचे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी चौकशी समितीने मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. त्यात तांत्रिक ज्ञान असलेले पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करणे, जास्तीत जास्त वेबसाइट उपलब्ध करून देणे, जास्तीच्या क्षमतेचे सर्व्हर विभागीय मंडळनिहाय उपलब्ध करून देणे, एनआयसी, एमकेसीएल यांचे सहकार्य घेणे यासह इतर काही सूचनांही त्यात समावेश करण्यात आला असल्याची माहिती खास सूत्रांकडून मिळालेली आहे.