मायणी – फक्त साखर उत्पादन करून शेतकऱ्यांना उच्चांकी दर देताना साखर कारखानदारांची दमछाक होत आहे. साखरेसोबत सहवीज निर्मिती, कम्पोस्ट, बगॅस, इथेनॉल प्रकल्प उभारून, पुढील हंगामात खटाव-माण ऍग्रो उच्चांकी दर देण्यासाठी प्रयत्नशील असेल, असे आश्वासन चेअरमन प्रभाकर घार्गे यांनी दिले.
खटाव-माण ऍग्रो साखर कारखान्याच्या चतुर्थ गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. कारखान्याचे को-चेअरमन मनोज घोरपडे, श्रीमती मंगल घोरपडे, संचालक कृष्णात शेडगे, प्रीती घार्गे, विक्रम घोरपडे, महेश घार्गे, तुकाराम गारळे, हणमंत घोरपडे, प्रकाश घार्गे, सनी क्षीरसागर उपस्थित होते. घार्गे म्हणाले, यावर्षी सर्वच कारखान्यांमध्ये गाळप कमी झाले असले, तरी साखर उतारा 10 ते 13 असून, यातून चांगला दर देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
मनोज घोरपडे म्हणाले, साखर कारखान्यांच्या स्पर्धेत उतरण्यासाठी, शेतकऱ्यांना समाधानकारक दर देण्यासाठी, चांगल्या दर्जाचा ऊस आणण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात येतील. कारखान्याची क्षमता साडेसहा मेट्रिक टनापर्यंत वाढवण्याचे काम पुढील हंगामापूर्वी केले जाईल. संग्राम घोरपडे म्हणाले, सध्या सर्वत्र उसाची उपलब्धता, उतारा यात मोठी तफावत आहे. पुढील हंगाम पावसावर अवलंबून असेल. या कारखान्याचा डिस्टिलरी प्लॅंट पुढील वर्षी पूर्ण होईल.
कारखान्याची गाळप क्षमता सहा हजार मेट्रिक टन होईल. यंदाच्या हंगामात ऊसतोडणी यंत्रणेबाबत सर्वत्र विस्कळीतपणा होता; परंतु केएम ऍग्रोच्या योग्य नियोजनामुळे तोडणी यंत्रणेची कमतरता जाणवली नाही. वेळेत मिळणाऱ्या उसाच्या बिलामुळे शेतकऱ्यांचा कारखान्याच्या नेतृत्वावर विश्वास आहे. हंगाम यशस्वी करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी, ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणेचे कामगार, कंत्राटदारांनी कष्ट घेतले. दरम्यान, हंगामाच्या सांगताप्रसंगी शेवटच्या उसाचे आणि सात लाख 13 हजाराव्या साखर पोत्याचे पूजन करण्यात आले. उच्चांकी ऊस तोडणी व वाहतूक करणारे कंत्राटदार व कामगारांचा सन्मानचिन्हे, शाल व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. सरव्यवस्थापक अशोक नलवडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.