राजनाथ सिंह यांचे इम्रान खान यांना आवाहन
नवी दिल्ली: इम्रान खान दहशतवादाविरुद्ध लढा देण्यास गंभीर असतील तर पाकिस्तानला सैन्य पाठविण्यास तयार आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सांगितले. “मी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना एक सूचना देऊ इच्छितो. आपण दहशतवादाविरूद्ध लढण्यासाठी गंभीर असाल तर आम्ही आपल्याला मदत करण्यास तयार आहोत. तुम्हाला सैन्य हवे असेल तर आम्ही त्यांना तुमच्या मदतीसाठी तिथे सैन्य पाठवू.’ असे राजनाथ सिंह म्हणाले.
हरियाणातील सोनिपत येथील सभेत ते बोलत होते. पाकिस्तानने प्रथम आपली विचारसरणी बदलावी. नाहीतर 1971 प्रमाणे पुन्हा विभाजन होईल, असा इशाराही राजनाथ सिंग यांनी दिला.
“आज पूर्ण सभ्यतेने, मला पाकिस्तानला एक सल्ला द्यायचा आहे की त्यांनी त्यांची विचार करण्याची पद्धत आणि त्यांच्या विचारसरणीची दिशा बदलली पाहिजे, अन्यथा पाकिस्तान ज्याचे पूर्वी दोन भागात विभागले गेले होते, ते आता बऱ्याच भागात विभागले जाईल.’ असे ते म्हणाले.
काश्मीरविषयीच्या टिप्पण्यांबद्दल इम्रान खान यांनाही सिंह यांनी टीका केली. काश्मीरला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आम्ही लढा सुरूच ठेवू. आंतरराष्ट्रीय मंचांवर काश्मीरचा मुद्दा पाकिस्तान उपस्थित करत राहील, असे इम्रान खान एका भाषणात म्हणाले होते. त्यावर उत्तर देताना “काश्मिर विसरा. याबद्दल विचार करू नका. प्रकरण वाढवल्याने काहीही होणार नाही. कोणीही आमच्यावर दबाव आणू शकत नाही.’ असे राजनाथ सिंह म्हणाले.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संबंध ताणले गेले. यात “सीआरपीएफ’चे 40 जवान शहीद झाले होते. जम्मू-काश्मीरला मिळालेला विशेष दर्जा मागे घेण्याच्या 5 ऑगस्ट रोजी झालेल्या केंद्राच्या निर्णयामुळे या नात्यात आणखी एक तेढ निर्माण झाली आहे.