मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावर आता” राहुल गांधी यांची यात्रा थांबवायची असती तर आम्ही पहिल्या दिवशी थांबवली असती, आम्हाला त्याच्यात रस नाही. मात्र महाराष्ट्रात येऊन वीर सावरकर यांच्याविरोधात बोलणे आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींना दिला आहे.
पुढे चंद्रशेखर बावनकुळे यांनी, “राहुल गांधी यांच्या वक्तव्याने देशाची मान खाली गेली आहे. वीर सावरकरांबद्दल राहुल गांधी आक्षेपार्ह वक्तव्य करत आहे. काँग्रेस पार्टी त्याचं समर्थन करत आहे. राहुल गांधी यांना सावरकरांचा इतिहास माहित असूनही ते जाणूनबुजून तो इतिहास दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. चुकीचे वक्तव्य केल्यामुळे देशात त्यांच्याबद्दल घृणा निर्माण होत आहे. देश राहुल गांधी यांना माफ करणार नाही. राहुल गांधींनी या यात्रेतून जे काही एक-दोन टक्के समर्थन कमावलं होतं तो या वक्तव्याने गमावला आहे.
राजीव गांधींच्या जयंती, पुण्यतिथीला उद्धव ठाकरे त्यांना आदरांजली वाहतात. मात्र आज माझा प्रश्न आहे की बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राहुल गांधी यांनी कुठेही प्रतिमेला फुलं वाहिलीत का, चार शब्द ते बोलले का? उद्धव ठाकरेंनी संपूर्ण पक्ष काँग्रेसच्या वेठीस बांधला आहे. ते काँग्रेसला समर्पित झाले आहेत. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल चुकीचं वक्तव्य केल्यानंतर उद्धव ठाकरे गट राहुल गांधींच्या यात्रेचा बहिष्कार जाहीर करतील, अशी आमची अपेक्षा होती. मात्र आदित्य ठाकरेंना ते पाठवतात. फक्त उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचं संविधान स्वीकारण्याएवढेच आता बाकी राहिले असल्याचा टोलाही त्यांनी लागावला.