नवी दिल्ली : देश हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एका केंद्रीय मंत्र्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या विधानानंतर त्यांच्यावर स्तरातून टीका होताना पाहायला मिळत आहे. कारण या प्रकरणी सुशिक्षित मुलींनी पालकांना सोडून लिव्ह इन रिलेशनशिप निवडल्याने हे प्रकार होत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी याविषयी बोलताना,”अशा गुन्ह्यांसाठी लिव्ह-इन-रिलेशनशिपच जबाबदार असल्याचं सांगत केंद्रीय मंत्री कौशल किशोर म्हणाले की, ” अशा घटना हल्ली सर्व मुलींसोबत घडत आहेत, ज्या सुशिक्षित आहेत आणि ज्या स्वतःला स्पष्टवक्त्या समजतात आणि भविष्यातील निर्णय स्वतः घेण्यास सक्षम असल्याचे समजतात.
श्रद्धा वालकर खून प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. “ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये का राहत आहेत? त्यांना तसे करायचे असेल, तर लिव्ह-इन-रिलेशनशिपसाठी योग्य नोंदणी करावी. जर आई-वडिल लिव्ह-इन-रिलेशनशिपसाठी तयार नसतील, तर कोर्ट मॅरेज करा आणि त्यानंतरच एकत्र राहा.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “मुलींनी विचार करायला हवा की, त्या असं का करताहेत?, सुशिक्षित मुलीच यासर्व प्रकारासाठी जबाबदार आहेत. कारण आई-वडिल दोघांनीही यासाठी नकार दिला होता. सुशिक्षित मुलींनी अशा रिलेशनशिपमध्ये येऊ नये.”
केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “मला तर याचं आश्चर्य वाटतंय की, ते असं नाही म्हणाले की, या देशात जन्म घेतल्यासाठीच मुली जबाबदार आहेत. निर्लज्ज, निर्दयी आणि क्रूर… सर्व समस्यांसाठी मुलींना दोष देण्याची मानसिकता सतत फोफावत आहे.”
प्रियांका चतुर्वेदींनी आणखी एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलंय की, “@PMOIndia खरंच महिला शक्तिबाबात ते जे बोलतात, ते खरंच त्यांना वाटत असेल, तर त्यांनी या केंद्रीय मंत्र्याला ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे. समाजातील अशा पितृसत्ताक मूर्खपणाचे ओझे आम्ही स्त्रिया सहन करतो. यापुढे उचलू शकत नाही.”