नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षात पुर्णवेळ अध्यक्ष नेमण्याची प्रकिया सुरू केली जावी अशी मागणी करणारे पत्र लिहीणाऱ्या 23 कॉंग्रेस नेत्यांची कृती ही पक्षातील बंडाची कृती मानली जात असली तरी यापैकी अनेक नेत्यांनी त्याचा इन्कार केला आहे. आमची ही कृती कोणाला आव्हान देण्याची किंवा पक्षाच्या विरोधात बंड करण्याची नव्हती तर ती पक्षाच्याच हिताची होती अशी भूमिका आता यातील अनेकांनी घेतली आहे.
या पत्रावर स्वाक्षरी करणारे पक्षाचे खासदार विवेक तनखा यांनी म्हटले आहे की, काय केल्यामुळे पक्ष आणखी मजबूत होंऊ शकतो एवढेच आम्ही या पत्राद्वारे निदर्शनाला आणून दिले आहे. माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी म्हटले आहे की, आम्ही हे पत्र पाठवून मोठा गुन्हा केला असल्याचा ज्यांचा समज झाला आहे त्यांनाही आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे महत्व पटेल.
या साऱ्या प्रकरणावर आज दुसऱ्या दिवशी कपिल सिब्बल यांनी पुन्हा भुवया उंचावणारी कॉमेंट ट्विटरवर टाकली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोणत्याहीं पदासाठी नव्हे तर देशाच्या हितासाठीच आम्ही ही कृती केली होती.
या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या एका नेत्याने स्वत:चे नाव न जाहींर करण्याच्या अटीवर प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की या पत्रावर सही करणाऱ्यांपैकी अनेक जण कालच्या कार्यकारीणीच्या बैठकीला हजर होते. तेथे जो अंतिम निर्णय झाला आहे त्याच्याशी आम्ही सर्व जण सहमत झालो आहोत.