नीरातील प्रचारसभेत अजित पवाराचा घणाघात
नीरा – अनेक वर्षे काँग्रेस सत्तेत होती, मात्र काँग्रेसला चांगल्या प्रकारे विकास करता आला नाही. पुणे शहरातील अनेक विकासकामे भाजपच्या काळात झाली. तर पालखी महामार्ग देखील भाजपच्या काळात पूर्ण होत आहे. इतक्या वर्षात त्यांना हे जमले नाही, त्यांना काहीच जमल नाही, म्हणून ते आता संविधान वाचवण्याच्या वल्गना करत आहेत; मात्र संविधानात काँग्रेसच्या काळातच अनेक वेळा बदल करण्यात आलेत, असा घणाघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी शनिवारी (दि. 4) नीरा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे माजी मंत्री विजय शिवतरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार अशोक टेकवडे, संभाजी कुंजीर, बाबा जाधवराव, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उत्तम धुमाळ, भाजपचे निलेश जगताप, रासपचे संजय निगडे, जालिंदर कामठे, नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, सदस्य राधा माने, गुळूंचे उपसरपंच दीपक निगडे, अॅड. अविनाश भारंबे, े, रेखा चव्हाण, शरद जगताप, सतीश काकडे, दिलीप यादवत आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणालेकी, ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच संविधान लिहिले, त्याच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विरोधात काँग्रेसने दोन वेळा उमेदवार उभे केले आणि त्यांचा पराभव केला. डॉ. आंबेडकरांच्या संविधानाचा दिवस हा काँग्रेसच्या काळात कधीच साजरा करण्यात आला नाही. मात्र मोदी सत्तेवर आल्यावर त्यांनी संविधान दिन सुरू केला. आज संविधान दिन देशभरात साजरा केला जातो. त्यामुळे मोदी सरकार संविधान बदलणार यावर लोकांनी विश्वास ठेवू नये. अस आवाहन त्यांनी केले. आभार विराज काकडे यांनी मानले.
सत्तेत असणारा खासदार हवा
पुरंदर तालुक्यातील आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न हे केंद्राच्या माध्यमातून सोडवावे लागणार आहेत आणि त्यामुळे सत्तेत असणारा खासदार आपल्याला हवा आहे, असेही ते यावेळी म्हणाले. प्रत्येक जण आपल्याकडे येईल आणि आपली बाजू मांडेल पण त्याकडे लक्ष न देता सुनेत्रा पवार आणि महायुतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
नीरा (ता. पुरंदर) : येथील सभेत बोलताना अजित पवार.