नवी दिल्लीे – मोदी सरकारने देशातील विमानतळे आणि रेल्वेचे आयआरसीटीसी हे महामंडळ विकायला काढले आहे, त्याला देशातील दहा प्रमुख कामगार संघटनांनी प्रखर विरोध दर्शवला आहे. मोदी सरकारने नफ्यात चालणारी विमानतळे विकण्याचे कारण काय असा सवालही या संघटनांच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. 19 ऑगस्ट रोजी देशातील आणखी तीन विमातळे अदानी ग्रुपला देण्याचा निर्णय झाला आहे.
आत्तापर्यंत 12 विमानळांच्या खासगीकरणाचा निर्णय झाला आहे. यातील अनेक विमानतळ नफ्यात चालत आहेत असे असताना त्यांच्या विक्रीची काय गरज आहे असा सवाल या कामगार संघटनांनी उपस्थित केला आहे.
एका कामगार नेत्याने सांगितले की, यातील एकही विमानतळ तोट्यात चालणारे नाही. थिरूवनंतपुर विमानतळ तर देशातला असा विमानतळ आहे की तो पहिल्या वर्षापासूनच नफ्यात आहे.
या विमानतळाने प्रत्येक वर्षी 125 कोटी रूपयांचा नफा कमावला आहे असे असताना हे विमानतळ विकण्याचा का घाट घातला गेला असा सवाल या कामगार संघटनांच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. ज्या संघटनांनी केंद्र सरकारच्या या खासगीकरणाचा निषेध केला आहे त्यात इंटक, आयटक, हिंद मजदूर सभा, सीटू, एलपीएफ अशा संघटनांचा समावेश आहे.