लुधियाना – आम्ही अंतर्गत किंवा राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयांवर कधीच राजकारण करीत नाही, असे आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबात पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींच्या प्रकरणावरून कॉंग्रेस व भाजपने गलिच्छ राजकारण केले होते. तशा प्रकारचे राजकारण आम्ही करीत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
लुधियाना येथे पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल म्हणाले, भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून गलिच्छ राजकारणाचे प्रदर्शन घडवले. तथापि, आम्ही मात्र अशा विषयांबाबत जबाबदारीची भूमिका घेतो.
आमचा पक्ष सत्तेत आल्यास आम्ही सार्वजनिक सुरक्षेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू, असे ते म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधात आम्ही भारत सरकारशी समन्वयाने काम करू, असेही त्यांनी नमूद केले. केजरीवाल म्हणाले की, पंजाब हे संवेदनशील सीमावर्ती राज्य आहे आणि ड्रग्ज आणि ड्रोनचा प्रसार रोखण्यासाठी येथे प्रामाणिक सरकार आवश्यक आहे.