शिरूरच्या पश्चिम भागात रविवारी आंदोलनाची दिशा ठरणार
पाबळ : शिरूरच्या पश्चिम भागातील 12 गावांचा प्रश्न आता 14 गावांचा झाला आहे. त्यामध्ये सोने सांगवी आणि लाखेवाडी गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. मंगळवारी (दि. 12) धामारी येथे झालेल्या बैठकीत या दोन गावांनी आपला सहभाग नोंदवला येत्या शुक्रवार (दि. 15) पर्यंत या सर्व गावांचे ग्रामसभेचे पाणी प्रश्नासंबंधीचे ठराव उपलब्ध होणार असून रविवारी (दि. 17) 14 गावांचा मेळावा पाबळ येथे संपन्न होणार आहे त्यानंतर या आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यात येणार आहे.
यावेळी धामारी गावच्या सरपंच सुरेखा पावसे, उपसरपंच रेखा गायकवाड, माजी सरपंच संपत कापरे, ज्येष्ठ नेते दत्तो भगत, कान्हूर खर्डे, केंदूरचे सरपंच सूर्यकांत थिटे, उद्योगपती प्रमोद पऱ्हाड, भरत साकोरे, गोविंद साकोरे, सनी थिटे, खैरेनगरचे रघुनाथ खैरे, पाबळचे सरपंच सचिन वाबळे, माजी सरपंच सोपान जाधव, हिवरेचे सरपंच दीपक खैरे, कान्हूर, धामारी, पाबळ, खैरेनगर, लाखेवाडी, हिवरे यांसह विविध गावांचे मान्यवर, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात पुढील आंदोलनासाठी पायाभूत गोष्टींची चर्चा करण्यात आली. यामध्ये आठ दिवसांत सर्व सहभागी गावांचे ग्रामसभेचे ठराव गोळा करण्याचे, सर्व गावांची विशेष कृती समितीची स्थापना करणे, त्याचप्रमाणे पाणी अभ्यास समितीची निवड करण्याचे नियोजन ठरवण्यात आले. या सर्व गावांमधील शेतकऱ्यांचा भव्य मेळाव्याचे आयोजन पाबाळ येथे करण्यात आले असून त्या ठिकाणी आंदोलनाची अंतिम दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती दादा खर्डे यांनी दिली.
…म्हणून आंदोलनाला वेग
याबाबतीत कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची भेट घेऊन समस्या मांडली त्यावेळी हजारे यांनी आंदोलनांची दिशा स्पष्ट करून सर्व गावे एक करा माझीही मदत होईल, असे सुचित केले आणि या भागाचे लोकप्रतिनिधी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क करून लक्ष घालण्यासाठी सुचवले त्यानुसार कान्हूरची बैठक रविवार (दि. 10) होईपर्यंत हा संपर्क करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र आजपर्यंत काहीही हालचाल न झाल्याने आंदोलनाला वेग आला असल्याची माहिती सुधीर पुंडे यांनी दिली. त्यामुळे आगामी काळात आता पाणीप्रश्न चांगला पेटणार असल्याची चिन्हे गडद झाली आहेत.
ते पाणी गरज भागवेल?
डिंभे, चासकमान धरणाचे धरणांचे ओव्हरफ्लो होत असलेले पाणी कदाचित या गावांची गरज भागवू शकेल का यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.
खासगी सर्व्हे करणार
बैठकीमध्ये सुरुवातीला आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचे सूतोवाच करण्यात आले असून ज्या गावांना जेथून पाणी उपलब्ध होईल त्या धरणातील पाणी उपलब्ध करून घेण्यासाठी समितीतर्फे खासगी सर्व्हे रिपोर्ट करून घेतला जाणार असून त्यानंतर शासनाशी संपर्क केला जाणार आहे.या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार वेगवान कार्यवाही करण्यात येणार आहे.