पुणे – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या “मेरी माटी मेरा देश’ उपक्रमाची गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 21 सप्टेंबरपर्यंत एक मूठ माती गोळा करून हातात माती घेऊन ती अमृत कलशामध्ये टाकतानाचा सेल्फी अपलोड करावा लागणार आहे.
“मेरी माटी मेरा देश’ उपक्रम राबवण्याबाबत मंत्रालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे यांनी सर्व विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व महाविद्यालयांमधून अमृत कलशामध्ये माती संकलित करून मुंबईत एकत्रित केली जाणार आहे.
दि. 3 ते 13 ऑक्टोबरदरम्यान प्रत्येक महाविद्यालयात 75 रोपांची अमृत वाटिका, अमृत वन, अमृत कोपरा, अमृत कुंडी, अमृत गार्डन तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संकलित केलेल्या मातीचा एक कलश तालुक्याच्या एका महाविद्यालयात 14 ते 20 ऑक्टोबरदरम्यान जमा करायचे आहेत. सर्व तालुक्यांचा एक कलश 28 आणि 29 ऑक्टोबरला मुंबई येथे एकत्रित करण्यात येणार आहेत.
“मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमात राज्यातील राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र आणि एनसीसी यांचा सक्रिय सहभाग आहे. या सहभागातून दिल्लीतील अमृत वाटिका येथे प्रत्येक महाविद्यालयातील माती जाईल. या उपक्रमाची गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात असल्याने सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. -राजेश पांडे, संयोजक, ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम