प्रशासनाकडून तकलादू उपाययोजना : रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
पिंपळे गुरव – जुनी सांगवी येथील जयमालानगर गल्ली नंबर पाच व सहामध्ये मुळा नदीत भराव टाकल्याने पाऊस जास्त झाला की नदीचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या घराचे व घरातील चीजवस्तूंचे नुकसान होत असून आरोग्य धोक्यात येत आहे.
मुळा नदीच्या काठावर काही नागरिक, व्यावसायिक यांनी भराव टाकून जागा तयार केली आहे. त्यावर आपली उपजीविका करण्यासाठी काही व्यवसाय, धंदे सुरू केले आहेत. तर काहींनी झोपड्या टाकून राहण्यासाठी त्या जागेचा वापर करत आहेत. परंतु भराव टाकल्यामुळे पावसाळ्यात नदीला पूर आला अथवा जास्तीचा पाऊस झाला तर जुनी सांगवीतील जयमालानगरमध्ये पाणी शिरते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. मागील वर्षीदेखील जुलै महिन्यात मुळा नदीला पूर आला होता.
नदी पात्रात नागरिकांनी अतिक्रमण करून पात्र अरुंद केल्यामुळे नदी आपली मर्यादा ओलांडून रहिवासी भागातून वाहत आहे. त्याचा फटका जागा घेऊन घरे बांधून राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयात वारंवार तक्रारी नोंदविल्या आहेत. परंतु महापालिका प्रशासनाचे अधिकारी येऊन पाहणी करून जातात. काही तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करून देतात. परंतु पुढील वर्षी पुन्हा तिचा स्थिती व प्रश्न निर्माण होत आहे.
यंदा आणखी म्हणावा असा पाऊस पडला नाही. परंतु पाऊस मोठ्या प्रमाणावर आला तर पुन्हा जयमालानगरमध्ये मुळा नदीचे पाणी शिरणार, अशी भीती येथील नागरिकांना सतावत आहे. पावसाचे पाणी रस्त्याने वाहून जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने येथील रहिवाशांनी प्रशासनाच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका प्रशासनाने त्वरित समस्या लक्षात घेऊन येथील नदीपात्रातील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होत आहे.
आरोग्यावर होतोय परिणाम
नदीच्या पुराचे पाणी येथील नागरिकांच्या घरादारांमध्ये आल्याने मोठे नुकसान होत आहे. तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. रहिवासी साथीच्या आजारांना बळी पडत आहेत. तसेच लहान मुलांचे आरोग्याला धोका निर्माण होत आहे. रहिवासी भागात पाणी साचून राहत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया अशा आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
प्रशासनाच्या नकर्तेपणामुळे नागरिकांना आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने मोठा फटका बसत आहे.
मनसेने यापूर्वीदेखील महापालिकेच्या सारथी ऍपवर तक्रार दाखल केली आहे. तसेच स्थानिक नागरिकांनीदेखील तक्रार केली आहे. या वर्षीदेखील महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात जेसीपीने भराव खोदून पाण्याला वाट करून दिली आहे. परंतु पावसाच्या पाण्याने भराव कोसळून पाण्याचा मार्ग बंद झाल्याने पुन्हा रहिवासी भागात पाणी येत आहे. तेव्हा महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन कायमस्वरूपाची उपाययोजना करावी, अन्यथा ह क्षेत्रीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.
– राजू सावळे, मनसे पदाधिकारी