नवी दिल्ली – मागील काही दिवसांपूर्वी इराणने चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला बाहेर काढल्याच्या चर्चा होत्या. भारताकडून निधी मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या चर्चा अफवा असल्याचे इराणने सांगितले आहे.
इराणच्या रस्ता व रेल्वे मंत्रालयाने सोमवारी भारतीय राजदूत गड्डाम धर्मेंद्र यांना चर्चा झाली. यावेळी मंत्रालयाचे उपमंत्री सईद रसोली यांनी भारतीय राजदूतासमवेत चाबहार बंदर आणि चाबहार-जाहेदान रेल्वे प्रकल्पात सहकार्य वाढविण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली.
यावेळी सईद रसोली यांनी म्हंटले कि, चाबहार-जाहेदान रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळल्याचे वृत्तात कोणतेही तथ्य नाही. अशा अफवा पसरवून काही बाह्यशक्ती दोन्ही देशांमधील संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ते कधीही यशस्वी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, इराणने चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला बाहेर काढले आहे. भारताकडून निधी मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत होते. भारत आणि चीनमध्ये तणाव वाढलेला असतानाच इराणने हे पाऊल उचलले आहे. इराण आणि भारत यांच्यात चार वर्षांपूर्वी चाबहारहून अफगाणिस्तान सीमेवर जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग बनवण्यासंदर्भात करार झाला होता. आता इराणने हा प्रकल्प स्वत:च पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून यावर कामही सुरु केले असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, यावर भारत अथवा इराणकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र, आज इराणने चाबहार रेल्वे प्रकल्पात भारत कायम असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.