भोर -भोर तालुक्यातील भाटघर धरण मध्यरात्री 12 वाजता 100 टक्के भरल्याने धरणातील स्वयंचलित 45 दरवाजांपैकी 17 दरवाजांतून 4 हजार 200 तर सायंकाळी 15 मोऱ्यातून 6 हजार 250 क्युसेकने नीरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे.
सुरुवातील धरणाचे स्वयंचलित 45 दरवाजांतून पाझरण्यास सुरुवात झाली होती. एकापाठोपाठ एक असे 15 दरवाजे उघडले गेले तर गुरुवारी (दि. 20) सकाळी सहाच्या सुमारास आणखी दोन स्वयंचलित दरवाजे उघडले गेले. नीरा देवघर धरण 92 टक्के भरले असून दोन-चार दिवसांत हेही धरण 100 टक्के भरेल असा अंदाज जलसंपदा विभागाने वर्तवला आहे.
नीरा देवघर धरण 11.88 टि.एम,सी. पाणी साठवण क्षमतेचे धरण असून या धरणातून 200 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे शाखा अभियंता परमानंद गोसावी यांनी सांगितले. दोन्ही धरणातील पाणी नीरा नदीद्वारे वीर धरणात जमा होत आहे. परंतु वीर धरणही 100 टक्के भरल्याने धरणातून दोन कालव्यांद्वारे 9 हजार 774 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
त्यामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, पावसाने विश्रांती घेतली असल्याने हा विसर्ग कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.