उत्सवाचे स्वरूप बदलले; पारंपरिक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रमांवर भर
हेळगाव (वार्ताहर) – सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन आता दोनच दिवसांवर येऊन ठेपले आहे. सर्वांच्या दु:खांचे निराकरण करणाऱ्या या विघ्नहर्त्याच्या आगमनाला यंदा करोनाचे विघ्न आले आहे. अत्यंत साधेपणाने हा उत्सव यंदा साजरा केला जाणार असल्याने भक्तांमधून नाराजी व्यक्त होत आहे. मात्र, अनेक मंडळाचे कार्यकर्ते यावर्षी पारंपरिक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रमांवर भर देणार आहेत.
गणेशोत्सवाला महाराष्ट्रात फार मोठी परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. दिवसेंदिवस यात खूप सुधारणा होत गेली असून आज हा उत्सव महाराष्ट्रातील प्रमुख उत्सव बनला आहे. गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत दहा दिवसांच्या कालावधीत प्रत्येक घरोघरी त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यात आनंदाचे वातावरण असते. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळते.लहान मुलांपासून ते अबाल वृद्धापर्यंत सर्वांनाच या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची ओढ असते.
गणेशास विघ्नहर्ता म्हटलं जाते. नावाप्रमाणेच मानवी जीवनात कोणत्याही प्रकारचे विघ्न आले तर त्यातून मार्ग हा विघ्नहर्ता काढतो, अशी श्रद्धा आणि प्रेम वाढत गेल्याने या उत्सवास आगळीवेगळी परंपरा निर्माण होत गेली. बाप्पाच्या आगमनाच्या कितीतरी दिवस आगोदर जय्यत तयारी सुरु असते.
चालू वर्षी मात्र, या उत्सवाला करोनाची दृष्ट लागली असेच म्हणावं लागेल. गेली चार ते पाच महिन्यांपासून संपूर्ण जग करोना या महाभयंकर संसर्गाला लढा देत आहे. त्यावर कोणत्याही प्रकारचे ठोस औषध नसल्याने फक्त झुंज द्यायचे काम चालू आहे.
करोनाचे संक्रमण एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार झाले आहे की, यामुळे सर्वच बाबींवर बंधने घालण्यात येत आहेत. यातून आपला लाडका बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता सुद्धा सुटलेला नाही. कोणत्याही प्रकारची गर्दी न करता साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे गणरायाच्या आगमनाला करोना संक्रमणाचे सावट असून कोणतेही धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. हे जरी खरे असले तरी विघ्नहर्त्याच्या कृपेने करोनाचे हे संकट कायमचे जावो, अशी प्रार्थना सर्व गणेशभक्त यावर्षी करणार हे मात्र नक्की!