मायणी (प्रतिनिधी) – खटाव तालुक्यातील मायणी, कानकात्रे व येरळवाडी येथील तलाव, सूर्याचीवाडी येथील पाझर तलावाचा परिसर स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांसाठी समूह संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 च्या कलम 36 (अ) अन्वये शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पर्यटक व व्यावसायिकांना लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन कोल्हापूर प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी केले.
खटाव तालुक्यातील मायणी येथील वनोद्यान व पक्षी आश्रयस्थान समूह संवर्धन राखीव क्षेत्र करण्याचा प्रस्ताव वन विभागाने केला आहे. या संदर्भात मायणी पक्षी आश्रयस्थान येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सातारचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, कोल्हापूरचे विभागीय वनाधिकारी (दक्षता) सागर गवते, सातारचे सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) संजीवन चव्हाण, वडूजच्या वनक्षेत्रपाल सौ. शीतल फुंदे, मानद वन कर्मचारी सुनील भोईटे, पक्षीप्रेमी प्रा. श्यामसुंदर मिरजकर, उपसरपंच आनंदराव शेवाळे, माजी उपसरपंच दादासाहबे कचरे, सूरज पाटील, ग्रामपंचायत सदस्य रणजित माने, राजू कचरे, वन विभागाच्या सौ. खाडे व शिंदे उपस्थित होते.
डॉ. बेन म्हणाले, खटाव तालुक्यातील या चार तलावांमध्ये विविध प्रकारचे पक्षी येतात. ते पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटक व पक्षीप्रेमींना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न शासकीय अनुदानातून केले जातील. या प्रकल्पामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी मिळतील. या संपूर्ण व्यवस्थेवर पाटबंधारे विभागाची मालकी राहणार आहे. डॉ. हाडा म्हणाले, हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ग्राम समिती स्थापन करण्यात येईल. या समितीकडून सुचवली गेलेली कामे नियमांनुसार पूर्ण करण्यात येतील. समूह संवर्धन राखीव क्षेत्र करण्याचा प्रस्ताव शासनाने संमत केल्यास असून पर्यटनाचा विकास व पर्यावरणाचे संरक्षण होईल. डॉ. येळगावकर म्हणाले, माझ्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश आले असून आता पर्यटनाला चांगले दिवस येतील.
सागर गवते म्हणाले, मायणीत चांगल्या प्रकारचे पक्षी आश्रयस्थान व्हावे, असे वाटत असले तरी या परिसराचा ताबा वन विभागाकडे नसल्याने अडचणी येत होत्या. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर येथे पक्षी निरीक्षक व गाइडस् तयार होतील. त्यासाठी इच्छुकांना प्रशिक्षण देण्यात येईल. देशविदेशी पक्षी येत असल्याने स्थानिक व्यवसायांमध्ये वाढ होईल. प्रा. मिरजकर, अंकुश चव्हाण,महेश जाधव, राजू कचरे, सूरज पाटील, दादासाहेब कचरे, पक्षीप्रेमी बाळासाहेब कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.