कोयनानगर (सातारा) – राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी २०१९ मध्ये तुमच्या पक्षाचे काही आमदार घेऊन पहाटेचा शपथविधी करून ४८ तासांचे सरकार करण्याचा प्रयत्न केला. ते करताना त्यांनी पक्षप्रमुख पवार साहेबांना विचारले होते का? मग आपण केलेली ती बेइमानी नव्हती का? असा प्रतिसवाल राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवार यांना केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पक्षात राहिले, वाढले त्याचठिकाणी त्यांनी बेईमानी केली, अशी टीका अजित पवार यांनी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यावर केली होती. या टीकेला उत्तर देताना मंत्री देसाई कडाडले. पाटण येथील त्यांच्या दौलतनगर येथील निवासस्थानी शनिवारी ते पत्रकारांशी बोलत होते. देसाई म्हणाले, “”एकनाथ शिंदे स्वाभिमानी नेते आहेत. ४० आमदार, १२ खासदार, १४ राज्यांचे राज्यप्रमुख, बहुतांशी जिल्हाप्रमुख शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत. त्यांच्या भूमिकेला व उठवाला अजित पवार बेईमानी शब्द वापरतात; हे पूर्णपणे चुकीचे असून २०१९ मध्ये तुमच्या पक्षाचे काही आमदार घेऊन तुम्ही पहाटेचा शपथविधी करून ४८ तासांचे सरकार करण्याचा प्रयत्न केला. ते करताना त्यांनी पक्षप्रमुख पवार साहेबांना विचारले होते का? मग आपण केलेली ती बेईमानी नव्हती का? असा प्रश्न आम्ही विचारला; तर तो योग्य होईल का? असा प्रतिसवाल मंत्री देसाई केला.
ते म्हणाले, ”आपली काम करण्याची पद्धत सडेतोड असली, तरी बोलताना कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, शिंदे यांच्या लाखो समर्थकांमध्ये असंतोष होणार नाही, याची खबरदारी आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे बोलताना कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्यावी. शिंदे समर्थक यापुढे असली वक्तव्ये कदापीही सहन करणार नाहीत, असा इशाराही देसाई यांनी यावेळी अजित पवार यांना दिला आहे.
…म्हणून आमच्या उठावला भक्कम पाठिंबा मिळाला
शिवसेनाप्रमुखांचे विचार हिंदुत्वाच्या विचारांपासून बाजूला नेण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात केल्याचा आरोप करून शिवसेना प्रमुखांचे विचार जोपासण्याचे काम खऱ्या अर्थाने आम्ही शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करीत आहोत. म्हणूनच संपूर्ण राज्यातून आमच्या उठावला भक्कम पाठिंबा मिळत असल्याचेही देसाई त्यांनी स्पष्ट केले.
आमच्या आमदारांना न्याय मिळेल
काँग्रेसचे आमदार फडणवीसांच्या संपर्कात असल्याच्या चंद्रकांत खैरे यांच्या विधानाचा समाचार घेताना मंत्री देसाई म्हणाले, चंद्रकांत खैरे यांना सध्या काम नाही. म्हणून ते आमच्यात भांडणे लावायचा उद्योग करीत आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आमच्या सर्वच १६ आमदारांना न्याय मिळेल; याचा आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.