राजगुरूनगर -खेड तालुक्यातील चास कमान धरण काठोकाठ भरले आहे. धरणात शनिवारी (दि. 29) सायंकाळी 99.28 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे डाव्या कालव्यातून 250 क्युसेकने पाणी सोडण्यात सुरुवात झाली आहे. तर कोणत्याही क्षणी सांडव्यातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने नदी काठच्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी दिली.
गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भरले आहे. यावर्षी खेड तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे त्यामुळे धरणे भरण्यास उशीर झाला आहे. भीमाशंकर भोरगिरी परिसरात पाऊस पडत असल्याने धरणे भरू लागली आहेत. तालुक्यातील चास कमान धारण भरले आहे. भामाआसखेड धरणातील पाणीसाठा वाढला आहे कळमोडी धरण यापूर्वीच भरले असल्याने काही प्रमाणात शेतकरी समाधानी आहेत. चास कमान धरणावर अवलंबून असलेल्या शिरूर तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधान पसरले आहे. त्यातच कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली असल्याने खेड आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सुटला आहे.
पूर्व भागात अत्यल्प पाऊस
पश्चिम भागात भीमाशंकर भोरगिरी परिसरात सरासरी एक हजार मिलीमीटरपर्यंत पाऊस पडला आहे. जो दरवर्षी तीन हजार मिलीमीटरपर्यंत पडत असतो तर तालुक्यात सरासरी 300 ते 400 मिलीमीटर पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. पूर्व भागात अजूनही पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने विहिरींची पाणीपातळी तळाला आहे.