नवी दिल्ली – काँग्रेस सोडून अनेक नेत्यांनी भाजपचा रस्ता धरला. काँग्रेसनेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे, ज्योतिरादित्य शिंदे यांनीही काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेतले. राहुल गांधींनी शिंदे यांच्या काँग्रेस सोडण्यावर नाराजी व्यक्त करत भाजपमध्ये त्यांना मिळत असलेल्या वागणूकीवरून टोला लगावला होता. त्याला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राहुल म्हणाले की ज्योतिरादित्य कॉंग्रेसमध्ये होते तेव्हा ते आमच्या शेजारी बसायचे. त्यांची भूमिका निर्णायक असायची. मात्र आज ते कुठे बसले आहेत ? भाजपने त्यांना मागच्या सीटवर बसवले आहे. शिंदे जेव्हा माझ्याकडे आले होते, तेव्हा मी त्यांना आणखी कष्ट घ्या, येणाऱ्या काळात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री व्हाल, असे त्यांना सांगितल्याची माहितीही राहुल यांनी यावेळी दिली.
राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, ‘राहुल गांधी यांना आता जेवढी काळजी आहे, तेवढी काळजी त्यांनी मी काँग्रेसमध्ये असताना करायला हवी होती, या पेक्षा अधिक मला काही बोलण्याची गरज वाटत नाही, असं शिंदे यांनी म्हटलंय.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या व्यतिरिक्त मध्य प्रदेशातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांनीही राहुल गांधी यांना टोला लगावला. आधी शिंदे यांना सन्मानाची वागणूक दिली नाही. सर्वकाही गमावल्यानंतर राहुल गांधी याबाबत बोलत आहेत. राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांची काळजी करावी. ते ही शिंदे यांचे मित्र असल्याची खोचक टीका शर्मा यांनी केली.