जनार्दन लांडे पाटील
शेवगाव – वर्दळीच्या ठिकाणी माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छतेचे उद्बोधन करण्याच्या शासनाच्या सूचनेनुसार शेवगाव नगरपरिषदेने येथील सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असलेल्या तहसील कार्यालयाचा परिसर असंख्य आकर्षक, विविध रंगी जाहिरातींच्या भित्तीफलकांनी सुशोभित केला आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाचा बाह्य परिसर चकाचक झाला असला, तरी कोट्यवधी रुपये खर्चाच्या या अद्ययावत भव्य वास्तूचा आतील परिसर अत्यंत गलिच्छ, अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त असा झाला आहे.
माजी आ. नरेंद्र पाटील घुले यांच्या दूरदृष्टीतून सुमारे सहा कोटींवर खर्चाच्या भव्य दोन मजली सुसज्ज वास्तूमध्ये तहसील कार्यालयाबरोबरच अन्य कार्यालये एकाच छताखाली आणली गेली. पुरवठा, निवडणुका, महसूल, सेतू, कृषी विभाग, खरेदी-विक्री, सहायक निबंधक, तलाठी, सामाजिक वनीकरण अशी विविध खाती एका छताखाली आणली गेली आहेत.
या दिमाखदार वास्तूचा आतील भाग मात्र अतिशय अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त आहे. गेल्या कित्येक दिवसांत ही वास्तू, अगदी राष्ट्रीय सण उत्सवालादेखील पूर्णपणे झाडून पुसून काढल्याचे निदर्शनास आले नाही.
करोनापासून तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात हात धुण्याची व्यवस्था आहे. म्हणजे एक पाणी नसलेला नळ आहे. त्याखाली पान तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगलेले बेसिन आहे. इमारतीच्या आत सर्व भिंतींच्या कडांना, जिन्याच्या पायऱ्यावर व प्रत्येक कानाकोपऱ्यात गाळीव मातीच्या फुफाट्याचे थर आहेत. प्रत्येक कोपरा पानतंबाखूच्या, माव्याच्या थरांनी रंगलेला आहे. त्यावरील आढ्याला जाळे जळमटे लटकलेले आहेत.
तहसीलदारांच्या केबिनसमोरच्या खिडक्यांतदेखील माव्याचे बोकणे टाकलेले आहेत. पान, तंबाखू, गुटखा, माव्याच्या पिचकाऱ्यांच्या लोळ्या खिडक्यांच्या गजांना लोंबकळत आहेत. तेथून उजव्या बाजूला वरच्या मजल्यावर जाणारा जिना आहे. त्याच्या पायऱ्यावर व आतील भागात प्रचंड धूळ व घाण साचलेली आहे. जोडीला अडगळीचे सामान आहे. कृषी विभाग, टंचाई विभाग, खरेदी-विक्री विभागाजवळील जिन्याची स्थिती यापेक्षा बेहत्तर आहे.
या इमारतीच्या मध्यभागी मोकळ्या आवारात विविध निवडणुकांच्या मतमोजणी वा कार्यशाळेसारखे उपक्रम घेतले जातात. हा आवारही कार्यालयातील खिडक्यांतून मारलेल्या पिचकाऱ्यांनी रंगलेला आहे. एवढ्या मोठ्या कार्यालयाच्या इमारतीमध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही. शासकीय कामासाठी तहसीलमध्ये येणाऱ्या महिलांची त्यामुळे मोठी कुचंबना होते. येथे असलेली स्वच्छतागृहे अतिशय घाणेरडी अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त आहेत.
या स्वच्छतागृहात जाणेच शक्य नाही. अशी त्यांची स्थिती आहे. गेल्या कित्येक दिवसांत ती साफ केली नाहीत. तेथील नळाला पाणी नाही. आतील भांड्याची फूटतूट झाली आहे. स्वच्छतागृहाबाहेरच मलमूत्र सर्वत्र पसरलेले असते. त्यावरील माशा, कृमी, कीटक, डास सर्वत्र घोंघावत असतात. तेथील दुर्गंधीमुळे स्वच्छतागृहाच्या दोन्ही बाजूच्या कार्यालयात जाताना नाकाला रुमाल लावूनच जावे लागते, अशी स्थिती आहे.
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा करणे अवघड!
अलिशान चारचाकी वाहने वापरणाऱ्या येथील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडून कार्यालयाच्या झाडलोटीची व स्वच्छतेची अपेक्षा करणे अवघड आहे. मात्र, कृषी विभागासह महसूल विभागातील एकापेक्षा एक सरस आमदनी असणाऱ्या विभागाने पाळीपाळीने का होईना बाहेरच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून झाडलोट व स्वच्छता करवून घेण्याची जबाबदारी पार पाडली व केलेली स्वच्छता टिकविण्याचे नागरिकांचे उद्बोधन केले, ते करताना प्रसंगी दंडात्मक कारवाई केली तरी चालेल; पण तशी मानसिकता हवी.
अनेकजण अर्थयुक्त कार्यात व्यतीत!
येथील तहसील कार्यालयात बहुतेक जण जिल्ह्याच्या ठिकाणाहून येणारे आहेत. ते कधीही कार्यालयात वेळेवर येत नाहीत, तर अनेकदा मीटिंगच्या नावाखाली परस्पर दांड्या मारत असतात. आल्यानंतरही बहुतेक वेळ अर्थयुक्त कार्यात व्यतीत होत असल्याने स्वच्छतेसारख्या बाबीकडे लक्ष द्यायला त्यांना अजिबात वेळ मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे!