दौंड – ‘मी तुला दुखावले आहे. मला माफ कर, तुला दुखावल्याने मला असे वाटते की माझा जगून काहीच उपयोग नाही. तुझं मन मोठं म्हणून तू माझ्यासाठी एवढे सगळे करतो. यासाठी मी तुझी आभारी आहे. मला तुझी प्रगती होताना बघायचंय; पण जाऊ दे तू नेहमी स्वतःची काळजी घे,’ असा शेवटचा निरोप बहिणीने आपल्या भावाला देऊन आपला जीवन प्रवास संपविला आहे. हे पत्र दौंड-काष्टी मार्गावरील सोनवडी गावाच्या हद्दीतील भीमा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीने भावाला लिहिले आहे.
नाजुका शामराव ननवरे (वय 17, रा. दौंड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार सोमवारी (दि. 22) रात्री 8.45 च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. नाजुकाचा भाऊ पुण्याला कामाला जातो. तो सोमवारी (दि. 22) सायंकाळी कामावरून दौंडला घरी परत येत असताना त्याला त्याच्या चुलत भावाचा नाजुका कुठे आहे, असा फोन आला. याबरोबरच ननवरे नावाच्या मुलीने भीमा नदी पुलावरून नदीपात्रात उडी मारली आहे, असे त्याने सांगितले. यावर तू चौकशी करून ये आणि मला कळव, असे मुलीच्या भावाने सांगितले.
मृत मुलीच्या भावाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली असता त्याला भीमा नदी पुलाजवळ त्याची बहीण वापरत असलेली दुचाकी (एमएच 14, सीटी 3794) दिसली. घटनास्थळावर उपस्थित नातेवाईक व जमलेल्या लोकांनी नाजुकाचा नदीपात्रात शोध घेतला असता ती मिळून आली. तिला त्वरित जवळच्या जिल्हा उपरुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ती मृत झाल्याचे सांगितले.