जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचे गडकोट, मंदिर आवार यांचे व्यवस्थापन आणि जत्रा -यात्रा उत्सवांचे नियोजन पाहणाऱ्या मार्तंड देवसंस्थान समितीवर गेल्या आठवड्यात सात विश्वस्तांच्या निवडी झाल्या आहेत. या निवडीमध्ये अनुभवी व सामाजिक कार्यकर्त्यांना डावलून बाहेरील सहाजणांच्या निवडी केल्यामुळे जेजुरी शहरात प्रचंड नाराजीचा सूर आहे.
देवसंस्थाच्या 7 विश्वस्तांपैकी 5 ते 6 विश्वस्त हे राजकीय पक्षाशी निगडीत असून ते बाहेरील रहिवासी आहेत. निवडीमध्ये एकच विश्वस्त स्थानिक निवडला असून जेजुरीतील नित्य वारकरी, सेवेकरी, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासू व्यक्तींना राजकीय हस्तक्षेप होत डावलले गेले आहे. ही बाब ग्रामस्थांसाठी अत्यंत दुर्दैवी आहे. या निवड प्रक्रियेचा निषेध करतो, याबाबत येत्या दोन दिवसांत मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिरात ग्रामस्थ बैठकीचे आयोजन करून उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
मागील विश्वस्तांची मुदत डिसेंबर 2022मध्ये संपल्याने धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून जाहीर निविदा प्रसिद्ध करून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार 500पेक्षा अधिक अर्ज सादर झाले होते त्या पैकी 95 अर्ज अपात्र ठरविण्यात आले तर 350 पेक्षा अधिक व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पुढील काळात शहरातील किमान 4 जण निवडण्यात याव्यात, अशी मागणी शहरातील अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली होती.
मुलाखती वेळी जेजुरी गडाला पायऱ्या किती? देवांची भूपाळी-आरती येते का? गाभाऱ्यात मूर्ती किती? जत्रा यात्रा उत्सवांचे महत्त्व? देवसंस्थान निगडित अनेक प्रश्न मुलाखत देणाऱ्या उमेदवारांना विचारण्यात आले होते; मात्र जेजुरीकर ग्रामस्थांना डावलून पुणे जिल्ह्यातील इतरत्र रहिवासी असलेल्या 5 व्यक्तींना निवडताना कोणते निकष लावले आहेत ? मंदिरावर स्वतःच्या पक्षाची पकड राहावी; म्हणूनच पक्षश्रेष्ठीनी निवड प्रक्रियेत हस्तक्षेप केला आहे. हा जेजुरीवासीयांवर अन्याय आहे असा आरोप हेमंत सोनवणे यांनी केला आहे.
न्याय व्यवस्थेत राजकीय हस्तक्षेप होऊन निवडी होणार असतील तर मुलाखती आणि अर्ज मागविण्याचा फार्स करता कशाला ? थेट राजकीय पातळीवरून निवडी करा .असे ग्रामस्थांमधून प्रतिक्रिया उमटत आहेत.सध्याचे विश्वस्त मंडळ बरखास्त करावे व स्थानिक ग्रामस्थांना न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असून यासाठी येत्या दोन दिवसांत ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीचे आयोजन करणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
विश्वस्तांनी पूर्ण वेळ देणे गरजेचे
देवसंस्थान विश्वस्त पद हे धार्मिक न्यासावरील सेवेचे पद आहे. राजकीय जोडे बाजूला ठेवून भाविकांच्या सोईसुविधेची आणि धार्मिक जत्रायात्रा उत्सवांचे नियोजन करण्याचे काम असल्याने विश्वस्तांनी सेवेकरी म्हणून या जबाबदारीकडे पहावे. स्थानिक विश्वस्त नियुक्त केल्यास पूर्णवेळ देवसंस्थानकडे लक्ष देता येते; मात्र जिल्ह्यातील इतरत्र असलेले प्रतिनिधी नियुक्त झाले की बहुतांश निर्णयाला मर्यादा येतात. 2017 ते 2022 या कालावधीकरिता निवड झालेल्या विश्वस्त मंडळात स्थानिक तीन व पुणे जिल्ह्यातील 4 प्रतिनिधी होते.
एकाच कुटुंबात दुसऱ्यांदा संधी
2012 ते 2017 या कालावधीत जेजुरीतील संदीप अशोक घोणे हे विश्वस्त न्यासावर कार्यरत होते तर त्यांच्या पत्नी अमृता घोणे या नगराध्यक्षा व पदसिद्ध विश्वस्त म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कुटुंबातील मंगेश अशोक घोणे यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळाली असून जेजुरी शहरातील ते एकमेव स्थानिक मानले जातात.