पीएमपीएमएलच्या डेपोत स्वच्छतागृहाअभावी प्रवासी, महिलांची कुचंबणा
वाघोली – वाघोलीतील पीएमपीएमएलच्या बस डेपोत प्रवाशांसाठी स्वच्छतागृह नसल्याने प्रवासी, विद्यार्थिनी व महिलांची स्वच्छतागृहाअभावी कुचंबणा होत आहे. चार वर्षापासून महापालिका प्रशासन बस डेपोत (बीआरटी टर्मिनल) स्वच्छता गृह तसेच टर्मिनल उभारण्यासाठी ठोस पाऊल उचलत नसल्याने प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पीएमपी, महापालिका प्रशासनाला गांभीर्य नाही
वाघोली स्थानकातून स्टेशन, हडपसर, भोसरी, निगडी, वारजे माळवाडी आदीसह शहरी भाग व उपनगरासह ग्रामीण भागातील आळंदी, वाडेबोल्हाई गावांनाही बस सेवा पुरवली जात आहे. वाघोलीत अनेक शाळा, कॉलेज, अभियांत्रिकी महाविद्यालय व गृहप्रकल्पामुळे नागरिकरणही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्याचबरोबर रोज व्यवसाय, नोकरी, उद्योगधंद्यामुळे पीएमपी बसने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची हजारोंच्या संख्येत आहे. शौचालयाबाबत अनेक नागरिकांनी व महिलावर्गाने अनेकदा तोंडी सांगूनही महापालिका प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे.
वाघोली येथील केसनंद फाटा परिसरात असणारी दोन एकर गायरान जागा महापालिकेने 2016 मध्ये ग्रामस्थांचा विरोध झुगारून पोलीस बंदोबस्तात घेतली होती. यानंतर पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी रावेतच्या धर्तीवर सुसज्ज असे बस टर्मिनल उभारणार असल्याचे जाहीर करत तात्पुरत्या स्वरूपात लोखंडी शेड आणि नियंत्रकाची खोली उभारली. तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारण्या व्यतिरिक्त महापालिका व पीएमपी प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही.
चार वर्षांमध्ये प्रवासी, महिला, विद्यार्थ्यांसाठी शौचालय किंवा पिण्याच्या पाण्याची सोय होईल, अशी कोणतीही मुलभूत सुविधा उभारली गेली नाही. तात्पुरते टर्मिनल उभारून चार वर्ष पूर्ण होत आले असले तरी पायाभूत सुविधा टर्मिनल परिसरात उभारण्याचे कोणतेही काम महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही.
याठिकाणी सुसज्ज बस थांब्याअभावी प्रवाशांचे होणारे हाल, प्रवासी व वाहक-चालकाची होणारी कुचंबणा, विद्युत रोषणाईचा अभाव, राडारोडा आणि कचऱ्याचे ठिकठिकाणी होणारे ढिग आदी कारणांमुळे टर्मिनल चार वर्षांपासून भकास अवस्थेमध्ये आहे. पावसाळ्यामध्ये टर्मिनलच्या जागेमध्ये परिस्थिती आणखीणच बिकट होत असते. बस डेपोच्या जागेसंदर्भात न्यायालयात वाद सुरु असल्याचेही बोलले जाते.