कोलकाता – प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आदिवासींच्या हिताच्या मोठ्या गप्पा मारतात. आता त्यांनी त्या प्रामाणिक आहेत हे सिद्ध करण्यासाठी आपल्या आमदारांना द्रौपदी मुर्मू यांनाच मतदान करण्याबाबतचा व्हीप जारी करावा, असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे नेते दिलीप घोष यांनी दिले आहे.
भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार म्हणून मुर्मू यांचे नाव जाहीर केले आहे. सध्या मुर्मू विविध राजकीय पक्षांच्या भेटी घेत त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच भाग म्हणून त्या ममता यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, आदिवासींच्या सरना या धर्माला मान्यता देण्याचा निर्णय प. बंगालच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला असून आता ममतांकडून हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाणार आहे.
मुर्मू या आदिवासी समुदायातील महिलेला भाजपने उमेदवारी दिल्यामुळे त्याचा राजकीय तोड काढण्याचा प्रयत्न ममता यांनी या निर्णयाद्वारे घेतला असल्याचे मानले जाते आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता घोष यांनी ममतांना आव्हान देणारे विधान केले आहे. बंगालच्या उत्तर भागात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेले आदिवासी सरना या धर्माचे पालन करतात.
मुख्यमंत्री-सोमय्या भेटीनंतर शिंदे गटात नाराजी; ठाकरेंना माफिया म्हणणाऱ्या सोमय्यांना…
बंगालचा हा भाग आणि झारखंडमधील आदिवासींना त्यांच्या धर्माला मान्यता मिळावी म्हणून मोठे आंदोलनही केले होते. त्यावेळी केंद्राच्या माध्यमातून आपण या धर्माला मान्यता मिळवून देऊ, असे आश्वासन ममता यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिले होते. आता आपणच आदिवासींच्या हितचिंतक असल्याचा ममता यांचा प्रयत्न असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, ममतांचा प्रस्ताव जर केंद्राने फेटाळला तर त्यांना राष्ट्रपतींकडे जाण्याचा पर्यायही आहे.
समृध्दी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा साक्षीदार ठरेल – मुख्यमंत्री शिंदे