नवी दिल्ली – भारतीय अर्थव्यवस्थेत ‘एक देश, एक कर’ या योजनेचे चांगले परिणाम दिसत आहेत. बँकांचे जाळे आणखी मजबूत झाले आहेत. बँकांच्या एनपीएमध्ये घट झाली आहे. आधीच्या तुलनेत परकीय गुंतवणूक दुप्पट झाली आहे. सुशासन आणि पारदर्शकतेमुळे आर्थिक सुधारणा वेगाने होत आहेत. मेक इन इंडिया हे सर्वात मोठे अभियान बनले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी संसदेत अभिभाषण केले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी नव्या संसद भवन इमारतीमधील त्यांचे हे पहिलेच भाषण असल्याचे सांगितले. लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांच्या संयुक्त सत्राला संबोधित करण्याआधी ऐतिहासिक सुवर्ण राजदंड सेंगोलचे अनुष्ठान केले गेले.
भारतीय संविधान लागू होऊन ७५ वर्ष झाले आहेत. मागच्या वर्षात भारताने अनेक ऐतिहासिक टप्पे गाठले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला. जी२० शिखर परिषदेच्या यशामुळे जागतिक स्तरावर भारताची भूमिका आणखी सशक्त झाली आहे, असे मुर्मू म्हणाल्या.
राष्ट्रपतींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला राम मंदिर निर्माण, जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७० काढून टाकणे अशा कामांचा उल्लेख केला. तसेच तिहेरी तलाक विरोधातील आणि नारी शक्ती वंदन कायद्याचा उल्लेख केला. आमच्या सरकारने लाखो युवकांना नोकऱ्या दिल्या. नारी शक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून महिलांना लोकसभेत आरक्षण दिले. आशियाई खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी १०० हून अधिक पदक जिंकले. प्राप्तीकर भरणाऱ्या लोकांची संख्या सव्वा तीन कोटींवरून आठ कोटीहून अधिक वाढली आहे. ही सगळी कामे अचानक झालेली नाहीत, मागच्या दहा वर्षांतील साधनेचा हा परिपाक आहे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.