अभिनेते संजीवकुमार यांचा जन्म 9 जुलै 1938 रोजी सूरत येथे झाला. आपल्या मुलाने डॉक्टर किंवा वकील व्हावे, अशी त्यांच्या आईची इच्छा होती, पण संजीवकुमार यांची अभिनयातील आवड पाहून त्यांनी चित्रपट प्रशिक्षण घेण्यासाठी दागिने गहाण ठेवले व शशधर मुखर्जी यांच्या अभिनय शाळेत त्यांना दाखल केले. त्यांचे वडिलांचे वास्तव्य सूरत येथे असले तरी चित्रपटसृष्टीची त्यांची इच्छा त्यांना मुंबईत घेऊन आली.
संजीवकुमार यांनी रंगमंचावर अभिनेता म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मुंबईमधील आयपीटीएपासून केली आणि नंतर इंडियन नॅशनल थिएटरमध्ये ते सामील झाले. वयाच्या 22 व्या वर्षी, त्यांनी अमेरिकन नाटककार आर्थर मिलर यांच्या “ऑल माय सन्स’ या रूपांतरित नाटकात एका वृद्ध माणसाची भूमिका केली होती. त्यानंतर ए. के. हंगल दिग्दर्शित “डमरू’ नाटकात त्यांनी पुन्हा 60 वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारली.
वर्ष 1960 मध्ये “हम हिंदुस्तानी’ मधील छोट्या भूमिकेतून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. भूमिका स्वीकारताना छोटी मोठी दुय्यम असा विचार न करता अभिनय चालूच ठेवला. वर्ष 1965 मध्ये नायक म्हणून “निशान’ या चित्रपटात काम केले. वर्ष 1968 मध्ये त्यांनी दिलीपकुमार यांच्यासोबत “संघर्ष’ या चित्रपटात काम केले. वर्ष 1969 मध्ये त्यांनी शम्मी कपूर आणि साधना यांच्यासोबत चित्रपट “सच्चाई’ मध्ये काम केले होते.
1972 साली प्रदर्शित झालेल्या “कोशिश’ या चित्रपटात त्यांच्या अभिनयाचा नवा पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या चित्रपटात मुक्या व्यक्तीची भूमिका साकारणे हे कोणत्याही अभिनेत्यासाठी मोठे आव्हान होते. संवाद न बोलता नुसत्या डोळ्यांनी आणि चेहऱ्यावरच्या हावभावांनी प्रेक्षकांना सर्व काही सांगणे हे संजीवकुमार यांच्या अभिनय कौशल्याचे उत्तम उदाहरण होते. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, “दस्तक’मधील हमीद व “कोशिश’मधील हरिचरण या भूमिकेसाठी मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार वर्ष 1976 मध्ये “आंधी’मधील जे. के. या भूमिकेसाठी व वर्ष 1977 मध्ये “अर्जुन पंडित’ मधील अर्जुन पंडित या भूमिकेसाठी मिळाला.
“कोई नो लडाख वायो’ या गुजराथी नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला होता. 70 च्या दशकात त्यांनी गुलजार यांच्याबरोबर काम केले. त्यांनी गुलजार यांच्यासोबत एकूण 9 चित्रपट केले, त्यातील मुख्य म्हणजे आंधी, मौसम, अंगूर, नमकीन हे त्यांचे चित्रपट त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानतात.
त्यांनी 1966 ते 1993 या कालावधीत सुमारे 140 चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यांनी मराठी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, सिंधी आणि त्यांची मातृभाषा गुजराथी अशा विविध भाषांमध्ये अनेक प्रादेशिक चित्रपट केले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्यातर्फे पुरस्कार तसेच आर्मी ऑफिसर्स व्हॉइस असोसिएशन ट्रॉफी हे सन्मानही त्यांना मिळाले.
संजीवकुमार यांनी लग्न केले नाही; पण अनेकदा प्रेम केले. कारण त्यांची एक अंधश्रद्धा होती की त्यांच्या कुटुंबातील मूल 10 वर्षांचे झाल्यावर त्याचे वडील मरण पावतात. हे त्यांचे आजोबा, वडील आणि भाऊ या सर्वांच्या बाबतीत घडले होते. 6 नोव्हेंबर 1985 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले.