मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज, मतदान पार पडत आहे. या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबर रोजी लागणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक गावात मतदारांची प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे मतदारापर्यंत भूमिका पोहोचण्याचा उमेदवारांकडून प्रयत्न सुरू होता. सर्वच प्रकारे उमेदवारांनी मतदारांजवळ जाण्यासाठी कस लावला. दरम्यान, आता आज प्रत्यक्ष मतदानाची रणधुमाळी असणार आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी हजारो पोलिस कर्मचारी गावागावामध्ये तैनात करण्यात आले आहेत. तर संवेदनशील असलेल्या गावांमध्ये अधिकचा फौजफाटा देण्यात आला आहे. याचबरोबर अधिकारी आणि कर्मचारी देखील मतदान यंत्रणेमध्ये हजारोंच्या संख्येने आहेत.
दरम्यान, राज्यातील अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751 अशा ग्रामपंचायतींमधील उमेदवारांचे भविष्य आज ठरणार आहे.