हैद्राबाद : देशात पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात तापायला सुरुवात झाली आहे. तेलंगणातील भाजपच्या खासदाराने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे वादाला तोंड फुटले असून भाजप खासदार डी. अरविंद यांनी, ‘कोणालाही मत द्या, पण ते मत भाजपलाच मिळेल’, असे म्हटले आहे.
निजामाबादचे खासदार असलेले डी. अरविंद यांनी, ‘लोक कोणत्याही पक्षाला मतदान करो, काँग्रेस किंवा नोटाला मतदान देतील. कोणतंही बटण दाबले तरी, आमचाच विजय होईल. काँग्रेसला मत दिलात तरी कमळच जिंकेल”, असे त्यांनी म्हटले. डी. अरविंद एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजप खासदाराच्या वक्तव्यावर सत्ताधारी भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) आक्षेप घेतला असून मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. बीआरएसने ईव्हीएम मशिनवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. बीआरएसने अरविंद यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करण्याची मागणी केली आहे.
बीआरएस पक्षाच्या नेत्यांनी तक्रार दाखल करत म्हटलंय की, ‘अरविंद यांचा इरादा स्पष्ट होत आहे. कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर बटन दाबले तर भाजपला मतदान जाईल. ईव्हीएममधील घोटाळ्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे या प्रकरणात गंभीरतेने चौकशी व्हायला हवी.’ खासदार डी. अरविंद यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.
पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर मी उत्तर दिले होते. मी म्हटलं होतं की, नोटा, काँग्रेस किंवा बीआरएसचे कोणतेही बटन दाबले, तरी माझ्या मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळे मी निश्चितच जिंकेन, असं ते म्हणाले. देशात ईव्हीएम घोटाळ्यावरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएम मशिनवर आक्षेप घेतला जातो. आता डी. अरविंद यांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्षाला आयते कोलित मिळाले आहे. त्यामुळे राज्यात या मुद्द्यावरुन राजकारण तापवले जाण्याची शक्यता आहे.