नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कॉंग्रेसकडून सातत्याने जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला जातो आहे. राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात भागिदारी दिली गेली पाहिजे. मात्र याच मुद्द्यावर कॉंग्रेसमध्ये वेगळे मतप्रवाह आहेत व ते येणाऱ्या काळात समोर येण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी जातगणनेच्या विरोधात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवले आहे.
जातनिहाय जनगणना हा काही रामबाण ठरू शकत नाही. तसेच बेरोजगारी आणि प्रचलित असमानतेवरही हा तोडगा ठरू शकत नाही. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या वारशाचा अनादर करण्याच्या रूपात या प्रकाराकडे पाहिले जाईल असे माझे विनम्रपणे म्हणणे असल्याचे आनंद शर्मा यांनी पत्रात म्हटले आहे.
ते पुढे म्हणतात १९८० मध्ये इंदिरा गांधी यांनी नारा दिला होता की न जात पर न पात पर, मोहोर लगेगी हात पर. १९९० मध्ये राजीव गांधी यांनीही जातीवादाला निवडणुकीचा मुद्दा बनविण्यास विरोध केला होता. आपल्या ऐतिहासिक भूमिकेपासून अचानक अशी फारकत घेणे अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी चिंतेचा विषय ठरेल. आपण त्यावर विचार करण्याची गरज आहे.
जात ही भारतीय समाजाची एक वास्तविकता आहे. मात्र कॉंग्रेसने ते कधी त्याचे राजकारण केले नाही आणि त्याचे समर्थनही केले नाही. समृध्द विविधता असलेल्या आपल्या देशात असे राजकारण लोकशाहीला घातक आहे. गरिब आणि वंचितांसाठी समानता आणि सामाजिक न्यायाचा भेदभाव रहित दृष्टीकोन अशी सर्वसमावेशक भूमिका कॉंग्रेसची राहीली आहे. याकडे शर्मा यांनी लक्ष वेधले.