नवी दिल्ली- सरकारच्या निवडणूक रोखे अर्थात इलेक्टोरल बॉंड योजनेला कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी हप्ता वसुली असे संबोधले होते. त्यावरून आज केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शहा यांनी राहुल यांना प्रत्युत्तर दिले आहे. हप्ता वसुली म्हटले जाणारे १६०० कोटी रूपये कॉंग्रेसला कुठून मिळाले हे अगोदर राहुल गांधी यांनी स्पष्ट करावे.
ही वसुली त्यांना कुठून मिळाली हे त्यांनी सांगावे. ही अत्यंत पारदर्शक अशी देणगी असल्याचा आमचा दावा आहे मात्र जर ते याला वसुलीचे लेबल चिकटवत असतील तर त्यांना मिळालेल्या पैशांचे विवरणही त्यांना द्यावे लागेल असे सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओत शहा यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पार्टीसुध्दा अन्य काही पक्षांप्रमाणे त्यांच्या देणगीदारांच्या यादीबद्दल माहिती देणार का असा प्रश्न शहा यांना विचारल्यावर ते म्हणाले एकदा आमचे हे विवरण समोर आले की इंडिया आघाडीच्या नेत्यांना जनतेचा सामना करणे अगदी कठिण होईल. भारतीय राजकारणातील काळ्या पैशाचा प्रभाव संपुष्टात आणण्यासाठीच इलेक्टोरल बॉंड आणले गेले होते.
मात्र आता ही योजनाच संपवण्यात आली असल्यामुळे पुन्हा काळा पैसा या प्रक्रियेत येण्याची भिती मला वाटते आहे. बॉंड पूर्णच रद्द करण्यापेक्षा त्यात सुधारणा केली जाण्याची आवश्यकता होती. मात्र आता माझ्या मानण्यामुळे काही फरक पडत नाही कारण सर्वोच्च न्यायालयानेच हा निर्णय दिला आहे व त्या निर्णयाचा आम्ही आदर करतो.
माझे स्वत:चे मत असे आहे की बॉंडमुळे राजकारणातील काळा पैसा जवळपास संपुष्टात आणला होता. केवळ याच कारणामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण इंडिया आघाडी बॉंडच्या विरोधात होती.