पंढरीची वारी…एक अनूपम सोहळा, जो महाराष्ट्राच्या भक्तीभावाचा ओळख बनला आहे. देश-विदेशांतील लोकांनाही या पंढरीच्या वारीने भुरळ घातली आहे. कोणालाही आमंत्रण न देता या सोहळ्यात लाखो लोक सहभागी होऊन पांडुरंगाला भेटायला जातात. याच पंढरीच्या वारीचे महत्त्व, तिचा भक्तीभाव याबद्दल “वारी अंतरंग’ या सदरातून जाणून घेणार आहोत.
पंढरपूरच्या या आषाढी वारीची परंपरा फार जुनी आहे. ही वारी निश्चित केव्हा सुरू झाली हे सांगणे कठीण आहे. मात्र, ही वारी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याही पूर्वीपासून चालत आली आहे, असे सांगितले जाते.
ज्ञानेश्वर माऊलींच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्याचप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्याही घराण्यात पंढरीची वारी होती. विश्वंभर बाबा हे तुकाराम महाराज यांच्या घराण्याचे मूळ पुरुष होत. विश्वंभर बाबा हे दर महिन्याच्या एकादशीला पंढरपूरला जात असत. ते संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समकालीन होते. संत ज्ञानेश्वर माऊली, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताई, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सेना महाराज, दामाजीपंत मंगळवेढेकर, संत चोखामेळा, संत जनाबाई यांच्यापुढे संत एकनाथ महाराज तसेच इतर समकालीन आदी संत मंडळी पंढरपूरची वारी करत असत.
विश्वंभर बाबा यांनी सुरू केलेली परंपरा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनीही कायम ठेवली. तुकाराम महाराज यांच्यानंतर वारीची परंपरा त्यांचे धाकटे बंधू कान्होबा यांनी पुढे सुरू ठेवली. तुकोबाराय यांची मुले मोठी झाल्यानंतर कान्होबा यांनी ही परंपरेची धुरा तुकोबाराय यांचे धाकटे पुत्र तपोनिधी नारायणबाबा यांच्या खांद्यावर दिली. इथपर्यंत पंढरीची वारी केली जायची. मात्र त्यानंतर नारायणबाबा यांनी या परंपरेला विस्तृत स्वरूप देऊन पालखी सोहळा सुरू केला.
एकत्रित पालखी सोहळा
तपोनिधी श्री नारायण महाराज यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा एकत्रित पालखी सोहळा 1685 साली सुरू केला. देहू येथे तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेऊन ते आळंदीला येत आणि तेथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पालखीत ठेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ होत असत. त्यावेळेपासूनच श्री नारायण महाराज यांनी पालखी सोहळ्यात व संप्रदायात “ज्ञानबा-तुकाराम’ हे भजन म्हणण्याची प्रथा सुरू केली.
1832 पासून माऊलींचा स्वतंत्र पालखी सोहळा
एकत्रित पालखी सोहळा तत्कालीन काही कारणांमुळे विभागला गेला आणि सन 1832 पासून आळंदी येथून माऊलींचे निस्सीम भक्त श्री हैबातरावबाबा आरफळकर यांनी वासकर महाराज, आळंदीकर यांसह भाविकांसोबत समन्वय साधून श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला. तेव्हापासून दोन्ही संतांच्या वेगवेगळ्या पालख्या पंढरपूरला जाण्याची प्रथा सुरू झाली. एकत्रित सोहळा सुरू असताना ज्या दिंड्या पालखी सोहळ्यात होत्या, त्या पालखी विभाजनानंतर विभागल्या गेल्या. तसेच काही एका दिंडीच्या दोन दिंड्या झाल्या. एक तुकोबाराय, तर एक माऊलींसोबत ठेवण्यात आली. पुढे दोन्ही पालखी सोहळ्यात दिंडीची संख्या वाढत गेली आहे. तसेच पुढे इतर भागातूनही संतांचे पालखी सोहळे सुरू झाले. राज्यासह परराज्यांतून विविध संतांचे पालखी सोहळे आषाढी वारीसाठी पंढरपूरात दाखल होत असतात.
दरवर्षी निघणारी ही वारी अखंडपणे सुरू आहे. जात-धर्म-पंथ-संप्रदाय हे सर्व विसरून फक्त “विठ्ठलभेट’ या एकमेव ध्येयाने हे लाखो वारकरी एका रेषेत चालत आहेत.
पंढरीची वारी आहे माझे घरी ।
आणिक न करी तीर्थव्रत ।।
व्रत एकादशी करीन उपवाशी।
गाईन अहर्निशी मुखे नाम।।
विठ्ठलाचे अखंड नामस्मरण करत हे वैष्णव आषाढी एकादशीला भेटतात आणि त्याच्या पायावर डोकं टेकवतात..मागणे मात्र काही नसते. केवळ पाय टेकवावेत, हीच त्याची श्रद्घा..भाव आणि भक्तीही!