नागरिक, श्तकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण
वालचंदनगर-इंदापूर तालुक्यात बिबट्याच्या दहशतीने गावागावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच कळंब येथील सुभेदारवस्ती नजीक व फडतरे नॉलेज सिटीच्या मागील बाजूच्या शेतामध्ये बिबट्यासदृश्य प्राण्याचे नागरिकांना दर्शन झाले आहे. या भागात बिबट्या दिसल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात ऊसाचे क्षेत्र अधिक असल्याने रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्याचा भीतीने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.
सोमवारी (दि. 10) सकाळी विजय सावंत हे शेतामध्ये काम करीत असताना त्यांना बिबट्यासदृश्य प्राणी दिसला. त्यांनी जिवाच्या भीतीने तेथून पलायन केले. त्यानंतर जवळच असलेल्या रामोशी वस्तीवरील नागरिकांना देखील मातीच्या शेतामध्ये बिबट्यासदृश्य पावलांचे ठसे दिसून आले आहेत. त्यामुळे वस्तीवरील शेतकरी घरामध्ये बसून राहिले आहेत. दिवसा कसेही कामकाज करता येईल मात्र रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे.
काटेवाडी परिसरातील बिबट्याच्या भीतीचे वातावरण ताजे असतानाच, बेलवाडी आणि कळंब परिसरात बिबट्यासदृश प्राणी आढळून आल्याने शेतकरी व नागरिकांनी रात्रीच्यावेळी सावध राहावे. शक्यतो घराबाहेर पडू नये अशी माहिती कृषी सहाय्यक अशोक मिसाळ यांनी दिली.