विश्रांतवाडी, दि. 11 – धानोरी, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, मुंजाबावस्ती, लोहगाव, कळस, कलवडवस्ती, श्रमिकनगर, खेसेपार्क परिसरात पावसाचा जोर जास्त असल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले. परांडेनगर, संकल्पनगरी, मुंजाबावस्ती, लक्ष्मीनगर सोसायटीमधील तसेच संतोषनगरमधील हनुमान मंदिराच्या परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली. पाणी साचल्याने लोहगाव-विश्रांतवाडी मुख्य रस्त्याला ठिकठिकाणी तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अपघात घडू नये म्हणून महावितरणकडून विद्युत प्रवाह बंद करण्यात आला आहे.
पावसाळ्यात नेहमीच ही समस्या निर्माण होत असते. स्थानिक नगरसेवक व लोकप्रतिनिधी यांच्या पाठपुराव्यामुळे पालिकेने धानोरी रस्त्यावरील लक्ष्मीनगर सोसायटीच्या आवारातून मोठ्या व्यासाची पावसाळी वाहिनी टाकली आहे. पावसाचा जोर असल्याने या वाहिन्या देखील ओसंडून वाहत होत्या, असे चित्र दिसून आले.
नाल्यांचा प्रवाह वळवल्याने धोका
धानोरी जकातनाका, लक्ष्मीनगर, गंगा आरिया सोसायटी परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, कलवडवस्तीतील गणराज चौक, लोहगाव रस्त्यावर, मुंजाबावस्तीतील धनेश्वर विद्यालय व “विमान बिल्डिंग’ इत्यादी ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते.
अक्षरशः रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सावंत पेट्रोल पंपाकडून आनंदपार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील हनुमान मंदिर परिसरातील घरांमध्ये व कळसमधील गंगाकुंज सोसायटीमध्ये देखील पाणी शिरले होते. या भागातील नाल्यांचा प्रवाह वळविण्यात आला आहे. त्यामुळे नेहमीच ही समस्या निर्माण होते.
दिघी डोंगरातून मोठा प्रवाह
दिघी डोंगर परिसरातून धानोरीकडे वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला होता. दिघी डोंगर परिसरातून अनेक छोटेमोठे नैसर्गिक नाले धानोरीकडे वाहतात. पण धानोरी, मुंजाबावस्ती परिसरात मागील अनेक वर्षात अनिर्बंध बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. ही बांधकामे करताना पाण्याचे नैसर्गिक प्रवाह असलेले नाले अडवण्यात अथवा बुजवण्यात आले आहेत. काही ठिकाणी नाल्यांचा प्रवाह बदलण्यात आला आहे. तसेच पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने पावसाळी लाइन व ड्रेनजलाइन भरून वाहताना दिसत होत्या.