राजगुरूनगर (रामचंद्र सोनवणे): खेड तालुक्यातील चास कमान धरण १०० टक्के भरले आहे. धरणातून सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ९२५ क्यूसेस वेगानं भिमानदीत पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर वाढल्यास जास्त विसर्ग करण्यात येईल भीमानदी काठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन सहाय्यक अभियंता प्रेमनाथ शिंदे यांनी केले आहे.
खेड तालुक्यातील कळमोडी, चासकमान, भामा आसखेड या तीन धरणांपैकी आज (दि. ४) चास कमान धरण १०० भरले. शिरूर आणि खेड तालुक्यातील उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तालुक्यातील दीड टीएमसी क्षमता असलेले कळमोडी धरण १५ दिवसांपूर्वी भरले आहे. आता पुण्याला पाणी पुरवठा करणारे तालुक्यातील तिसरे भामा आसखेड धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या उंबरठ्यावर आहे.
आज अखेर भामा आसखेड धरण ८५ टक्के भरले आहे.चास कमान धरण मागील वर्षी ३०ऑगष्ट ला भरले होते चास कमान धरणातून भीमा नदीत ९२५ क्यूसेस, धरणाच्या डाव्या कालव्यातून ५५० क्यूसेस वेगाने तर वीज प्रकल्पा साठी ३०० क्यूसेस असे एकूण १७७५ क्यूसेस पाणी विसर्ग सुरु आहे.
खेड तालुक्यातील भोरगिरी भीमाशंकर परिसरात यावर्षी पावसाने दरवर्षीचे रेकॉर्ड मोडले आहे. या परिसरात जून ते आज अखेर सुमारे १८०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गेली वीस वर्षातील सर्वाधिक पाऊस झाला तर तर भीमेला सर्वाधिक मोठा पूर आला. २१,२२,२३ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कळमोडी आणि चास कमान धरणात पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली. तालुक्यातील २ धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने आणि एक धरण भरण्याच्या उंबरठ्यावर असल्याने पुणे -पिंपरी शहर व खेड शिरूर तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
खेड तालुक्यातील तीन धरणाची पाणी पातळी, पर्जन्यमान पुढील प्रमाणे
चासकमान धरण:
एकूण पाणी पातळी ६४९.५३ दशलक्ष घनमीटर
एकूण साठा २३९. ६९ दशलक्ष घनमीटर (८.५३ टीएमसी)
उपयुक्त पाणीसाठा २१४. ५० दशलक्ष घनमीटर (७.५७ टीएमसी)
टक्केवारी १०० %
आज पर्यंत धरण क्षेत्रात झालेला पाऊस- ४४० मिलिमीटर.
भामा आसखेड धरण:
एकूण पाणी पातळी ६६९.२८ दशलक्ष घनमीटर
एकूण साठा १९७. ८६ दशलक्ष घनमीटर (६.९९ टीएमसी)
उपयुक्त पाणीसाठा १८४.३४ दशलक्ष घनमीटर (६.५१ टीएमसी)
टक्केवारी ८४.९० %
आज पर्यंत धरण क्षेत्रात झालेला पाऊस- ७०८ मिलिमीटर.
कळमोडी धरण:
एकूण पाणी पातळी ६८७.००दशलक्ष घनमीटर
एकूण साठा ४२.८७ दशलक्ष घनमीटर (१.५१ टीएमसी)
उपयुक्त पाणीसाठा ४२.६७ दशलक्ष घनमीटर (१.५०टीएमसी)
टक्केवारी १०० %
आज पर्यंत धरण क्षेत्रात झालेला पाऊस ९३२ मिलिमीटर.