नवी दिल्ली – विराट कोहली याला भारतीय संघातील स्थान टीकवायचे असेल तर इंग्लंडविरुद्ध सुरु झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सरस कामगिरी करावी लागेल. त्याने अपयशातून बाहेर येत मोठी खेळी केली तरच त्याचे टी-20 संघातील स्थान टीकेल, असे मत भारताचा धडाकेबाज माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवाग याने व्यक्त केले आहे.
गेल्या जवळपास तीन वर्षांत कोहलीला मोठी खेळी करता आलेली नाही. त्याने 2019 सालानंतर एकही शतक फटकावलेले नाही. मोठ्या फलंदाजासाठी हे चांगले लक्षण नाही. कोहली फलंदाजी करताना खूपच गंमतीदार चुका करत आहे. त्याचे पाय व डोके स्थिर नसते, तो चेंडूवर खूप लवकर जाण्याचा प्रयत्न करत आहे व त्याच प्रयत्नात बादही होत आहे. त्याने सरावादरम्यान राहुल द्रविडला पंचांच्या जागी उभे राहण्याची विनंती करत तंत्र गिरवायला हवे. संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविड कायमच त्याला मदत करेल, असेही सेहवाग म्हणाला.
ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. या संघात कोहलीला स्थान मिळेल का याबाबत आत्ताच काही बोलता येणार नाही मात्र, त्याने जर अपयशावर मात करत सातत्यपूर्ण सरस कामगिरी केली नाही तर मात्र, त्याच्या स्थानाला धोका निश्चितच होऊ शकतो. कोहलीकडे मोठा अनुभव आहे व त्या स्पर्धेत तोच निर्णायक ठरेल मात्र, अखेर निवड समिती काय निर्णय घेते हे महत्वाचे आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा दीपक हुडाने त्याचे सोने केले. त्यामुळे कोहलीची जागा घेण्यासाठी भारतीय संघाला एक भक्कम पर्याय उपलब्ध झाला आहे, असा इशाराही सेहवागने कोहलीला दिला आहे.
धोक्याचा इशारा
दीपक हुडा, सूर्यकुमार यादव या खेळाडूंनी मिळालेल्या संधीचा पुरेपुर लाभ घेत आपली कामगिरी सिद्ध केली आहे. कोहलीला जीतकी संधी मिळाली त्यासाठी त्याला नशिबवानच म्हटले पाहीजे. मात्र, त्याने लवकरात लवकर भरात येणे गरजेचे आहे अन्यथा त्याच्या टी-20 संघातील कारकीर्दीला निश्चितच धोका निर्माण होणार आहे, असे भाकितही सेहवागने कोहलीबाबत केले आहे.