मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई महापालिकेची निवडणुक होण्याची घोषणा आता कोणत्याही होऊ शकते. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षाने कंबर कसली असल्याचे दिसत आहे. भाजपकडून तर मुंबई पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सभा, बैठका यांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत असताना त्यातच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी हे आरोप करत असताना करोना काळात झालेला मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे वक्तव्य करत तत्कालीन ठाकरे सरकारवर आरोप केले आहेत.
संदीप देशपांडे यांनी, “एक व्यक्ती शाखेत आली. त्या व्यक्तीने काही कागदपत्रं आणि पेन ड्राईन शाखेत दिली. त्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाहीत. मात्र मी तो पेन ड्राईव्ह पाहिला, कागदपत्रं पाहिली. विरप्पन गँगने करोना काळात मुंबईची लूट केली. या लुटीचे ढळढळीत पुरावे या पेन ड्राईव्हमध्ये आहेत. सोमवारी २३ जानेवारी रोजी आम्ही हे सगळं माझ्यमांसमोर मांडणार आहोत. तसेच पोलिसांत तक्रारही देणार आहोत,” असे संदीप देशपांडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
वीरप्पन गॅंग चा करोना काळातला मोठा घोटाळा सोमवार दिनांक 23जानेवारी ला उघड करणार पुराव्या सहीत
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 21, 2023
दरम्यान, भाजपानेदेखील मुंबई पालिकेतील व्यवहारावर आक्षेप घेत ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी करोना काळात ठाकरे गटातील नेत्यांनी मोठे आर्थिक घोटाळे केले आहेत, असा आरोप केलेला आहे. असे असतानाच संदीप देशपांडे २३ जानेवारी रोजी नेमका कोणता घोटाळा समोर आणणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दरम्यान, संदीप देशपांडे यांनी केलेल्या गंभीर आरोपावर अद्याप विरोधी पक्षाकडून कोनतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे देशपांडेंच्या आरोपावर नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणे गरजेचे आहे.