हल्लेखोर जमावाला पसार होण्यास मिळाला अवधी
नवी दिल्ली : रविवारी जेएनयूमध्ये मास्क घातलेल्या गुंडांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्यावर कुलगुरू एम. जगदेश कुमार यांनी संध्याकाळी 6.45 वाजता मुख्य गेटबाहेर पोलिस तैनात करण्याचा निरोप पाठविला. हल्लेखोर पसार झाल्यावर तासाभरानंतर पोलिसांनी विद्यापिठाच्या आवारात प्रवेश केला, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
रविवारी संध्याकाळी झालेल्या या हल्ल्यानंतर कुलगुरूंनी त्वरेने कार्यवाही न केल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली जात आहे. विद्यापिठामध्ये दुपारपासून तणावाचे वातावरण होते. तत्पूर्वी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास विद्यापिठाच्या परिसरातील पेरियार वसतिगृहातून पोलिस कंट्रोल रूमला हिंसाचाराबद्दल पहिला कॉल आला होता.
याची पोलिसांनी त्वरित दखल घेतली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यापिठाच्या व्यवस्थापन कक्षाजवळ तैनात असलेल्या पोलिसांना ताबडतोब घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या गेल्या. पेरियार हॉस्टेलमध्ये काही लोकांनी विद्यार्थ्यांना काठ्यांनी मारहाण केली होती. तथापि या गटाने वसतिगृहात प्रवेश केला नव्हता. संध्याकाळी 4.15 वाजेपर्यंत पेरियार हॉस्टेलमधून पोलीस नियंत्रण कक्षाला 17 कॉल आले होते.
पेरियार वसतिगृहातील जमावाला पांगवल्यानंतर पोलिस कर्मचारी प्रशासकीय गटात परत आले. सायंकाळी 5.15 च्या सुमारास पोलीस उपायुक्त देवेंद्र आर्य विद्यापिठाच्या कॅम्पसमध्ये आले आणि त्यांनी पेरियार वसतिगृहातील परिस्थितीची पाहणी केली. परिस्थिती नियंत्रणात असल्याची खात्री पटल्यावर ते मुख्य द्वाराजवळ आले.
पेरियार वसतिगृहातील घटनेनंतर जेएनयू विद्यापीठाचा मुख्य गेट बंद होते आणि पोलीस उत्तर गेटवर तैनात होते, मात्र विद्यापिठाच्या आत हिंसाचार सुरूच होता. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वसंत कुंज उत्तर पोलिस ठाण्याचे प्रभारी आणि जिल्ह्यातील प्रत्येक स्थानकातील 20 अधिकाऱ्यांना बोलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सायंकाळी 5.30 ते 5.45 च्या सुमारास पोलिसांना पुन्हा एकदा फोन आला आणि विद्यापीठात सुमारे 700 जण घुसल्याचे सांगितले गेले. व्यवस्थापन कक्षाजवळच्या पोलिसांना पुन्हा तेथे पाठवले गेले. पण या ठिकाणी कोणताही जमाव नव्हता. पोलिसांना कॉल ज्या मोबाईलवरून आला होता, त्यावर संपर्क साधला गेला तेंव्हा तो “स्वीच्ड ऑफ’ होता.
“जेएनयु’शिक्षक संघटनेने काढलेल्या शांतता मोर्चाला अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. या मोर्च्यात अडथळा आणल्यावर हे सर्व विद्यार्थी साबरमती हॉस्टेलमध्ये घुसले आणि त्यांनी तेथील सामानाची मोडतोड केली. याच दरम्यान डाव्या गटांशी संबंधित विद्यार्थीही एकत्र आल्याने हाणामारी सुरू झाली. त्याच्या तासाभरानंतर 6.45 वाजता कुलगुरूंनी पोलिसांना मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाचारण केले, असे सूत्रांनी सांगितले.
त्यानंतर 7.30-7.45 वाजता विद्यापिठाकडून पाठवलेले लेखी पत्र पोलिसांना मिळाले. मात्र पोलिसांनी येऊन हस्तक्षेप करेपर्यंत जमाव पसार झाला होता. पोलीस उपायुक्तांनी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आईशा घोष यांना रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये नेले, असेही सूत्रांनी सांगितले.