विविध कारणांवरून जीवनयात्रा संपवणाऱ्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वांधिक
नवी दिल्ली : देशात 2018 या वर्षी विविध कारणांवरून 1 लाख 34 हजार 516 जणांनी आत्महत्या केली. त्यामध्ये 10 हजार 349 शेतकरी आणि शेतमजुरांचा समावेश आहे. जीवनयात्रा संपवणाऱ्यांत शेतकरी आणि शेतमजुरांचे प्रमाण 7.7 टक्के इतके आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोच्या अहवालातून संबंधित आकडेवारी जारी करण्यात आली. देशात 2016 या वर्षी 11 हजार 379 शेतकरी आणि शेतमजुरांनी आत्महत्या केली. ते प्रमाण 2018 या वर्षी घटले. जीवनयात्रा संपवणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये बहुतांश पुरूष आहेत.
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 5 हजार 763 शेतकऱ्यांचा आणि 4 हजार 586 शेतमजुरांचा समावेश आहे. त्यात महिलांचे प्रमाण अनुक्रमे 306 आणि 515 इतके आहे. पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, उत्तराखंड, मेघालय, गोवा, चंडीगढ, दमण आणि दिव, दिल्ली, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीत एकाही शेतकरी किंवा शेतमजुराने आत्महत्या केल्याची नोंद नाही.
शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्येशी संबंधित 2017 या वर्षातील आकडेवारी उपलब्ध करण्यात आलेली नाही. देशात 2017 मध्ये विविध कारणांवरून एकूण 1 लाख 29 हजार 887 जणांनी आत्महत्या केली. ते प्रमाण 2018 मध्ये 3.6 टक्क्यांनी वाढले.
महाराष्ट्रात 2018 मध्ये सर्वांधिक 17 हजार 972 जणांनी जीवनयात्रा संपवली. त्याखालोखाल आत्महत्या करणाऱ्यांच्या प्रमाणाबाबत तामीळनाडू, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांचे क्रमांक लागले. महाराष्ट्रासह पाच राज्यांत आत्महत्या करणाऱ्यांचे एकुणात प्रमाण सुमारे 51 टक्के इतके आहे.