नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आज फरार उद्योजक विजय मल्ल्याची एक याचिका फेटाळून लावली. विजय मल्ल्याने 40 दशलक्ष डॉलर आपल्या मुलांकडे हस्तांतरित केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने त्याला 2017 साली न्यायालयाच्या अवमान प्रकरणात दोषी ठरवले होते. त्या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी मल्ल्याच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात केली होती.
या आदेशांचा फेरविचार करण्याइतपत कोणतेही सबळ कारण आपल्याला आढळले नसल्याचे न्या. यु. यु. ललित आणि न्या. अशोक भूषण यांच्या पिठाने सांगितले.
किंगफिशर एअरलाईन्सच्या 9 हजार कोटी रुपयांच्या कर्जबुडवेप्रकरणी मल्ल्या आरोपी आहे. सध्या मल्ल्या ब्रिटनमध्ये आहे. मल्ल्याने दियागो या ब्रिटिश कंपनीतून 40 दशलक्ष डॉलर आपल्या मुलांकडे हस्तांतरित केले आहेत.
हा न्यायालयाच्या वेगवेगळ्या आदेशांचा सर्रास भंग असल्याचे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली बॅंकांच्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.